Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: जल जीवनच्या कामांची ऑन द स्पॉट तपासणी; कारण...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अतंर्गत सुरू असलेल्या हजारांवर कामांबाबत लोकप्रतिनिधी, सरपंच यांच्या तक्रारी वाढत आहेत.

पालकमंत्र्यांनी (Dada Bhuse) मागच्या आठवड्यात जागेवर जाऊन कामांची तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतर जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी योजनांची प्रत्यक्ष तपासणी सुरू केली आहे. त्यांना पहिल्याच दिवशी कामांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अधिक तक्रारी असलेल्या दहा तालुक्यांमध्ये त्या योजनांची तपासणी करणार आहेत.

नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनच्या १२२२ कामांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यातील ७७ कामे अद्याप सुरू झाली नसून सुरू असलेल्या कामांबाबत सरपंच व आमदार यांच्या अनेक तक्रारी आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिशा समितीच्या बैठकीत सुरू असलेल्या कामांचे वाभाडे काढले होते.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध मनुष्यबळ व एकूण कामांची संख्या याचे व्यस्त प्रमाण असल्यामुळे सुरू असलेल्या कामांची तपासणी करता येणे शक्य नसल्याने विभागाने एक मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपवर अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतरचे फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यानंतरच त्या कामाचे देयक दिले जाते. मात्र, केवळ अॅपवर विसंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अधिक तक्रारी असलेल्या १० तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांच्या पडताळणीसाठी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या पथकास प्रत्यक्ष पाहणी करण्यास नेमणूक केली आहे.

या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून, मंजूर झालेल्या कामांप्रमाणे काम सुरू आहे की नाही याची पडताळणी करावी. पाण्याचे स्त्रोत, पाण्याचे पाईप, पाण्याटी टाकी याबाबतही पडताळणी करावी अशा सूचना मित्तल यांनी दिल्या.

या पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची पाहणीने सुरवात करण्यात आली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशनची आढावा बैठक घेतली. यात रायते येथील कामांबाबत तक्रारी असल्याने त्यांची चौकशी करण्याचा निर्णय झाला. पेगलवाडी पाणी योजनेचे स्त्रोत कोरडे असल्याचे बैठकीत निष्पन्न झाले. बोरीची वाडी देवगांव येथील पाणी पुरवठा योजनेत पाण्याची टाकी खाली बांधण्यात आली असून पाण्याचा स्त्रोत वरती आहे यात पाणी वरती येत नसल्याचे उघड झाले.

मेटघर किल्ला येथील काम संथगतीने सुरू असल्याने त्याबाबत विचारणा करण्यात आली. कोंटबी येथील कामे अद्यापही सुरू नसल्याचे समोर आले. एका तालुक्यात पहिल्याच पाहणीत एवढ्या तक्रारी समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यातील योजनांची काय स्थिती असेल, याचा अंदाज येत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

जलजीवन मिशनच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शाखा अभियंता व उपअभियंता यांची आहे. या अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली की नाही हे बघणे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांचे काम असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आतांत्रिक वरिष्ठांकडे ही जबाबदारी सोपावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.