Swachh Bharat Mission
Swachh Bharat Mission Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : स्वच्छ भारतच्या यशासाठी कचऱ्याच्या ब्लॅकस्पॉटवर CCTVची...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : स्वच्छ भारत अभियानामध्ये नाशिक महापालिकेचा (Nashik Municipal Corporation) सलग तीन वर्षे क्रमांक घसरला आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने पहिल्या दहामध्ये येण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील कचऱ्यांचे ७८ ब्लॅकस्पॉट निश्‍चित केले असून हे कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रत्येक ब्लॅक स्पॉटवर प्रत्येकी दोन याप्रमाणे १५६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर शहरातील २६ स्मशानभूमीमध्येही प्रत्येकी चार याप्रमाणे १०४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी कंपनीतर्फे सध्या शहरात सीसीटीव्ही कॅमरे बसवण्याचे काम सुरू असल्याने त्यांच्याकडेच या अतिरिक्त २६० कॅमेरे बसवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. यासाठी  स्मार्टसिटी कंपनीच्या आगामी बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीची मुदत मार्च अखेरीस संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी व त्यानंतर देखील शिल्लक राहिलेले प्रकल्प पूर्ण केले जाणार आहे. नव्याने कुठले प्रकल्प हाती घेता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारच्या आहे. स्मार्ट सिटी कंपनीकडे महापालिकेचा निधी आहे. या निधीतून माहिती व तंत्रज्ञान संदर्भातील प्रकल्प राबवण्यात प्राधान्य देण्याच्या सूचना आहे. त्या अनुषंगाने शहरातील कचऱ्याचे ब्लॅकस्पॉट नष्ट करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रस्ताव तयार केला आहे.

ब्लॅक स्पॉटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर त्याचे कंट्रोल महापालिका व स्मार्टसिटी कंपनीच्या कमांड कंट्रोल सेंटर कडे राहील. कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना ३०० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईला होणारे जावे लागेल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक आवेश पलोड यांनी दिली. महापालिका हद्दीमध्ये २६ स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीदेखील सीसीटीव्हीच्या नजरेत आणल्या जाणार आहे. नाशिक शहरातील २६ स्मशानभूमीमध्ये  प्रत्येकी चार असे  १०४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव स्मार्टसिटी कंपनीकडे आरोग्य व धन व्यवस्थापन कचरा विभागाच्या वतीने सादर करण्यात आला आहे.

पहिल्या दहामध्ये येण्याची धडपड
स्वच्छ भारत अभियानामध्ये २०१९ मध्ये नाशिक शहराचा ६७ वा क्रमांक आला होता. २०२० मध्ये चांगले यश मिळविताना अकराव्या क्रमांकापर्यंत मजल मारली. २०२१ मध्ये मात्र सतरापर्यंत क्रमांक घसरला. २०२२ मध्ये विसावा क्रमांक आला. महापालिकेला पहिल्या दहा शहरांमध्ये क्रमांक मिळवण्याचे स्वप्न आहेत, मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. असे असले तरी महापालिकेला जे शक्य आहे, त्यावर सध्या काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ब्लॅकस्पॉटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन सुरू आहे.