Job
Job Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : महापालिकेची 706 पदांसाठी जुलैत भरती प्रक्रिया

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने नोकर भरती करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीसोबत तीन वर्षांचा करार केला आहे. यामुळे पाहिल्या टप्प्यात महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील एकूण ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या ७०६ पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली. 

महापालिकेत परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत. महापालिकेला ब वर्गाचा दर्जा मिळालेला असल्याने १४ हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तो आराखडा मंजूर झालेला नाही. प्रशासकीय खर्च ३५ टक्क्यांच्या वर जात असेल तर रिक्तपदांची भरती करू नये. अशा शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. दरम्यान कोरोना काळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. मात्र, भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्या अशा स्पष्ट सूचना अध्यादेशामध्ये आहेत. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांच्या माध्यमातूनच भरती प्रक्रिया राबवता येणार आहे. आधी नकार नंतर होकार असे नाट्य झाल्यानंतर अखेर नाशिक महापालिकेने टीसीएस सोबत नोकर भरती राबवण्याचा करार केला आहे.

महापालिकेसोबत काम करण्यास नकार दिल्यानंतर  आता महापालिका 'आयबीपीएस'च्या मदतीने भरती प्रक्रिया राबवणार आहे.या साठी कराराचा मसुदा तयार करून त्याला महासभेची मान्यता घेण्यात आली. त्यानंतर मागील आठवड्यात  टीसीएससमवेत करारदेखील करण्यात आला. भरतीसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर एप्लीकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून, त्यासाठी कंपनीकडून प्रोजेक्ट मॅनेजरची नियुक्तीदेखील करण्यात आली. आगामी तीन वर्षासाठी हा करार असून आता कुठलीही भरती टीसीएसमार्फतच केली जाणार आहे.

उमेदवार संख्येनुसार शुल्क

टीसीएस कंपनीच्या माध्यमातून भरती करताना एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे. दहा हजारापर्यंत परीक्षार्थी आल्यास एका उमेदवारासाठी ६७५ रुपये आर्थिक मोबदला कंपनीकडून आकारला जाणार आहे. दहा हजार ते पन्नास परीक्षार्थी आले तर एका उमेदवारासाठी सहाशे रुपये दर आकारला जाणार आहे. एक लाखांपर्यंत परीक्षार्थी आल्यास प्रत्येक उमेदवार ५७५ रुपये असा दर आकारला जाईल दोन लाखांपर्यंत ५५० रुपये, पाच लाखांपर्यंत उमेदवार आल्यास ४७५ रुपये याप्रमाणे मोबदला द्यावा लागणार आहे.