नाशिक (Nashik): बहुचर्चित सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठीची भूसंपादन प्रक्रिया जानेवारी २०२४ मध्ये थांबवल्यानंतर बरोबर दोन वर्षांनी पुन्हा भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या महामार्गासाठी १०७.३३ हेक्टर जमीन तातडीने संपादित करण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित भूधारकांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हा महामार्ग नाशिक ते अक्कलकोट, असा होणार असल्याने या भूसंपादनातून दिंडोरी, पेठ व सुरगाणा हे तालुके वगळण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथून सुरू होऊन अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर व अक्कलकोट असा हा महामार्ग असून तेथून पुढे तो चेन्नईपर्यंत जाणार आहे. अक्कलकोट ते चेन्नई या महामार्गाचे काम याआधीच सुरू झालेले आहे.
केंद्र सरकारने भारतमाला योजनेंतर्गंत सुरत ते चेन्नई हा एक हजार दोनशे किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्याची घोषणा केली होती. हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पेठ, दिंडोरी. नाशिक, निफाड, सिन्नर या सहा तालुक्यांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता.
दरम्यान केंद्र सरकारने भारतमाला योजनेची मुदत संपल्यानंतर त्याला मुदतवाढ न दिल्याने हा प्रस्तावित महामार्ग रखडला होता. यामुळे जिल्हा प्रशासनाला भूसंपादन प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश दिले होते. तोपर्यंत जिल्हा प्रशासनाने नाशिक तालुक्यातील साधारण ३५ हेक्टर भूसंपदान केले होते.
सुरत-चेन्नई असा हा महामार्ग असला तरी त्याचे काम अक्कलकोटपासून चेन्नईपर्यंत सुरू होते. मात्र, भारतमाला योजनेला मुदतवाढ न दिल्याने उर्वरित सुरत ते अक्कलकोट या मार्गाचे काय, असा प्रश्न होता. दरम्यान पालघरमधील वाढवण येथील बंदराला मान्यता मिळाल्यानंतर सुरत ते अक्कलकोट हा स्थगित केलेला महामार्ग अक्कलकोट ते नाशिक असा करण्याचा सुधारित प्रस्ताव तयार करून त्याला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता घेण्यात आली.
सुधारित मान्यतेनुसार हा महामार्ग आता चेन्नई ते नाशिक असा असणार आहे. नाशिकच्या आडगाव येथून तो रिंगरोडने इगतपुरी ते तवा या प्रस्तावित महामार्गास जोडला जाईल. तेथून तो वाढवण बंदर व पुढे सुरत असा जाणार आहे. यामुळे नाशिक ते सुरत असा यापूर्वी मंजूर केलेला मार्ग तुर्त रद्द झाल्यात जमा आहे.
सुधारित आराखड्यानुसार आता हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथून सुरू होऊन अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर, अक्कलकोटमार्गे पुढे चेन्नईपर्यंत जाणार आहे. जिल्ह्यात आता नाशिक, निफाड आणि सिन्नर या तीन तालुक्यांमधील ३० गावांमधून हा महामार्ग जाईल.
त्याकरिता जिल्हा प्रशासनाला ३८७.३३ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी २८० हेक्टर जमिनासाठी भूसंपादन नोटीसा देण्याची प्रक्रिया यापूर्वीच राबवली असून उर्वरित १०७.३३ हेक्टर क्षेत्र अधिग्रहित करण्यासाठी रस्ता परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
त्यानुसार १६०.३ ते १७२.६ किलोमीटर या टप्प्यातील जमिनींसाठी हरकती व सूचनांची नोंद करण्यासाठी भूधारकांना २१ दिवसांची मुदत दिली आहे. भूसंपादन प्रक्रिया झाल्यानंतर पुढील दोन वर्षांत महामागांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
असा आहे महामार्ग
नाशिक-अक्कलकोट लांबी -३७४ किलोमीटर
७० मीटर रुंदीचा १५२ किलोमीटर मार्ग
६० मीटर रुंदीचा २२२ किलोमीटर मार्ग
२७ मोठे पूल १६४ लहान पूल
या गावांमधून जाणार महामार्ग
नाशिक तालुका : आडगाव, विंचूर गवळी
निफाड तालुकाः चेहडी, वहेदारणा, लालपाडी, दारणासांगवी, सावळी, चाटोरी, रामनगर, पिंपळगाव निपाणी, तळवाडे
सिन्नर तालुका : देशवंडी, पाटपिंप्री, बारगाव पिंप्री, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी, घोडेवाडी, कहांडळवाडी