Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission Tendernama
उत्तर महाराष्ट्र

जलजीवनच्या 'फेल' विहीरींवर बंधाऱ्यांचा उतारा; चार कोटी निधीतून...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जलजीवन मिशनच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांपैकी जवळपास पाच टक्के ठिकाणी उद्भव विहीरींना पुरेसे पाणी लागले नाही. यामुळे योजना अपयशी ठरून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून नाशिक जिल्हा परिषदेने 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून अशा 28 ठिकाणी या विहिरींलगतच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, साठा वाढवणे आदी कामे हाती घेतली आहेत. यासाठी चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात 1358 गावांमध्ये पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहेत. त्यापैकी 476 योजनांची कामे सुरू आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून या योजनांसाठी उद्भव विहिरी खोदताना भूजल सर्वेक्षण विभागाकडून शिफारस घेतली जाते. त्यानंतर तेथे विहिरी घेतल्या जातात. मात्र, काही ठिकाणी त्या उद्भव विहिरीना योजनेसाठी अपेक्षित जलस्रोत मिळत नाहीत. यामुळे योजना अपयशी होऊन लाभार्थी वंचित राहण्याचा धोका आहे. यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होऊ नये. तसेच योजना अपयशी ठरू नये म्हणून जिल्हा परिषद प्रशासक लीना बनसोड यांनी या विहिरींच्या लगत असलेल्या सिमेंट बंधारे, पाझर तलाव यांची दुरुस्ती करणे, साठवण क्षमता वाढवणे आदी उपाययोजनाची शक्यता पडताळून बघण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ग्रामपंचायत विभागाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून अशा विहिरींच्या लगतच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला.

नाशिक जिल्हा परिषदेला 2022-23 या वर्षासाठी 25.12 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून त्यातील दहा कोटी निधी पेयजल योजना राबवण्यासाठी उपलब्ध झाला आहे. नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू असताना पहिल्या टप्प्यात 28 ठिकाणी उद्भव विहिरीना जिवंत स्रोत मिळाले नाही. यामुळे या योजनांमधून अपेक्षित पाणी पुरवठा उपलब्ध होणार नाही. तसेच एकदा मंजूर केलेल्या योजनेस वाढीव निधी मिळणार नाही. यामुळे 15 व्या वित्त आयोगातील पेयजल योजना निधीतून उद्भव विहिरींलगतच्या बांधाऱ्यांची साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून त्यासाठी आराखडे मागवून घेऊन 28 ठिकाणच्या जलस्रोत वाढवण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत.

तालुका निहाय बंधारे :

सिन्नर एक, येवला तीन, नांदगाव एक, मालेगाव दोन, चांदवड दोन, देवळा एक, बागलाण तीन, कळवण एक, दिंडोरी दोन, सुरगाणा दोन, पेठ पाच, त्रिंबक चार