Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg
Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg Tendernama
उत्तर महाराष्ट्र

समृद्धीवरील अपघातात जीव वाचवण्यासाठी वापरले 'हे' नवीन तंत्रज्ञान

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते इगतपुरी या ८० किलोमीटरच्या टप्प्याचे शुक्रवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यापूर्वी उद्घाटन झालेल्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्यामुळे या दुसऱ्या टप्प्यात अतिवेगातील वाहनाचा अपघात झाल्यास त्यातील प्रवाशांना एकाएकी जोराचा झटका बसून होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी व्हावी तसेच वाहनांचे नुकसानही कमीतकमी व्हावे, यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 'इम्पॅक्ट एटेन्युएटर' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या दुसऱ्या टप्प्यातील १२२ स्ट्रक्चरवर असे २४४ इम्पॅक्ट एटेन्युएटर्स बसविण्यात आले असून यामुळे अपघाताची तिव्रता कमी होऊन वाहनांचे कमीत कमी नुकसान होईल. तसेच अपघातात जीवित हानी होणार नाही, असे महारष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे म्हणणे आहे.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर आता शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर या ८० किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यातील महामार्गाचे शुक्रवारी (दि.२६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाचे डिसेंबरमध्ये लोकार्पण झाल्यानंतर आतापर्यंत अनेक अपघात होऊन पन्नासच्या आसपास नागरिकांना जीव गमवावा लागला असून या अपघातांमुळे विरोधकांकडून या महामार्गाबाबत टीका होत आहे.

सरकारने अपघातांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समितीही नेमली होती. दरम्यान अपघात झाल्यानंतर त्याची तिव्रता कमी होऊन जीवितहानी टाळण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने इम्पॅक्ट एटेन्युएटर्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी शिर्डी ते इगतपुरी या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानानुसार पुलांचे कठडे वा कॉंक्रिटचे बांधकाम असणाऱ्या ठिकाणी इम्पॅक्ट एटेन्युएटर्स बसवण्यात आले आहेत.

अतिवेगातील वाहने अशा कठोर बांधकामांवर आदळल्यास त्या वाहनांची गतिज ऊर्जा (कायनेटिक एनर्जी) या इम्पॅक्ट एटेन्युएटरमध्ये शोषली जाते. त्यामुळे आतील व्यक्ती एकदम फेकली जाण्याची अथवा वाहनाच्या आतील भागावर आदळण्याच्या प्रक्रियेतील तीव्रता कमी होऊन वाहनातील व्यक्तींना कमीत कमी शारीरिक इजा होईल परिणामी जीवितहानीचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच इम्पॅक्ट एटेन्युएट कठडे वा अन्य कठीण बांधकामांच्या प्रारंभी व शेवटाला बसवण्यात आले असल्यामुळे वेगातील वाहन थेट या कठीण बांधकामांना धडकण्याऐवजी अगोदर इम्पॅक्ट एटेन्युएटरला धडकले जाईल व त्याचे कमीत कमी नुकसाान होणार आहे.