Reliance Industries Mukesh Ambani
Reliance Industries Mukesh Ambani Tendernama
उत्तर महाराष्ट्र

रिलायन्सकडून गुड न्यूज! नाशिकच्या अक्राळे एमआयडीसीत मोठी गुंतवणूक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : रिलायन्स उद्योज समूह (Reliance Industries) व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) यांनी नाशिकमध्ये चार हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) त्यांना दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे अनुक्रमे 160 एकर व 50 एकर जागेचा ताबा दिला आहे. रिलायन्स उद्योग समूहाची रिलायन्स लाईफ सायन्स ही कंपनी लस व औषधांची निर्मिती करणार आहे, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन क्रायोजेनिक टॅंक तयार करणार आहे. हे दोन उद्योग सुरू झाल्यानंतर जवळपास पाच हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात सातपूर, अंबड एमआयडीसीमध्ये भूखंड शिल्लक नसून, सिन्नरचे सेझ बंद पडले आहे. यामुळे नाशिकला थोडेफार कृषी प्रक्रिया वगळता नवीन गुंतवणूक येत नाहीत. यामुळे नाशिकचा औद्योगिक विकास खुंटला आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स उद्योग समूहाने यापूर्वी नाशिकमध्ये 2100 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेही गुंतवणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर एमआयडीसीच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाने या दोन्ही उद्योग समूहांशी समन्वय साधत त्यांना दिंडोरी तालुक्यात अक्राळे येथील भूखंड दाखवले. एमआयडीसीने अक्राळे येथे नवीन भूसंपादन करून भूखंड विकसित केले आहे. ही जागा विमानतळ, महामार्ग, कृषी उद्योग, संभाव्य लॉजीस्टिक पार्क, ड्राय पोर्ट यांच्यापासून जवळ आहे. यामुळे रिलायन्स व इंडियन ऑइल या दोन्ही उद्योगांनी अक्राळे येथील जागेला पसंती दिली. त्यानुसार एमआयडीसीने रिलायन्स उद्योग समूहाला 160 एकर व इंडियन ऑइल कॉर्पिरेशनला 50 एकर भूखंड ताब्यात दिले आहेत.

रिलायन्स उद्योग समूहाची रिलायन्स लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड याठिकाणी लस व औषधे निर्मिती करणार आहे. त्यात प्रामुख्याने प्राणी व माणसांना लागणारे प्रथिने, प्लाझ्मा थेरपीची औषधे यांचे उत्पादन करून त्याची निर्यात केली जाणार असल्याचे त्यांनी एमआयडीसीला दिलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला ऑक्सिजन साठवण्यासाठी क्रायोजेनिक टॅंकची निर्मिती करण्यासाठी हवी असलेली 50 एकर जागा एमआयडीसीने दिली आहे. या ठिकाणी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. हे दोन्ही प्रकल्प एक दीड वर्षांत उभारले जातील, असा एमआयडीसीला विश्वास आहे. या दोन उद्योगांमुळे अक्राळे एमआयडीसीमध्ये आणखी उद्योग येण्यासाठी इच्छुक आहेत, असे एमआयडीसीतर्फे सांगण्यात येत आहे.