Highway
Highway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशकात मुंबई-आग्रा महामार्गावर दिवाळी पूर्वीच दिवाळी; 9 कोटींचा...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मुंबई - आग्रा महामार्गावरील (Mumbai - Agra National Highway) अंधाराचे साम्राज्य कमी होऊन अपघात व लुटीच्या घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने (NHAI) नाशिक शहरासह वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोड प्रकाशमय करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या निधीतून  924 पथदीप उभारण्यात येणार आहेत. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील अंधार हटवण्यासाठी खासदार गोडसे काही दिवसांपासून पाठपुरावा करीत आहे. नाशिक शहर परिसरातील आणि नाशिक - आग्रा महामार्गावर विजेच्या खांबाची संख्या अतिशय कमी आहे. त्यात अनेक पथदीप सतत बंद असल्याने महामार्गावर कायमच लहान, मोठे अपघात होत असतात.

मुंबई- आग्रा महामार्ग तसेच वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल फ्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोडवर विजेचे पथदीप बसवण्यासाठी आणि त्याच्या देखभाल करण्यासाठी 8 कोटी 76 लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. नाशिक शहर परिसरातील मुंबई -आग्रा महामार्गाच्या 40 किलोमीटर अंतरावर दोनही बाजूच्या सर्व्हिसरोडसह 544, वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल या दरम्यानच्या दहा किलोमीटरच्या अंतरावर 322, तर कोकणगाव शिवारातील सुमारे पावणे दोन किलोमीटर अंतरावर 58 प्रखर उजेड देणारे एलईडी पथदिपे बसविल्यानंतर याच निधीतून त्यांची देखभाल होईल. एकूण पन्नास किलोमिटर अंतरात 924 विजेचे पोल उभारले जाणार आहे.

पावसाळ्यात या मार्गावर रात्रीच्या अंधारात खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. या अपघातामुळे काहींनी जीव गमवलेला असून, अनेकांच्या वाट्याला कायमचेच अपंगत्व आलेले आहे. अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरील लुटीच्या घटना घडल्या आहेत. या नव्या पथदीपांमुळे अपघात टळू शकणार आहेत.