Kasara Ghat
Kasara Ghat Tendernama
उत्तर महाराष्ट्र

जुन्या कसारा घाटात धोका वाढला; यामुळे बंद आहे रस्त्याचा काही भाग

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मुंबई - आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नाशिक - मुंबई (Mumbai-Nashik) अंतर कापण्यास वाहनांना दुप्पट वेळ जात असतानाच कसारा घाटात मुंबईवरून नाशिककडे येणाऱ्या मार्गाला मोठे तडे (Cracks) गेले आहेत. यामुळे या मार्गावर जवळपास 200 फूट अंतरावर एक फूट अंतराच्या भेगा पडल्या आहेत. धोका टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने तात्पुरते बॅरिकेड लावले आहेत. यामुळे या महामार्गवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची डोकेदुखी वाढणार आहे.

या पावसाळ्यात मुंबई - आग्रा महामार्गवर नाशिक ते मुंबई या भागात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. महामार्ग प्राधिकरणने ऑगस्टमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही पावसाची संततधार सुरूच राहिल्यामुळे पेवरब्लॉक भोवती आणखी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामूळे हे पेवरब्लॉक वाहतुकीसाठी मोठे अडथळे ठरले. या 200 किमी अंतरात रस्ता उरलाच नसून वाहन चालकांना अक्षरशः खड्ड्यांतून वाहने चालवावी लागत आहेत. एवढे मोठे अंतर खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहने नादुरुस्त होणे, अपघात होणे, वाहने खड्ड्यांत फसणे आदी प्रकार सतत घडत असतात. यामुळे नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी वाहनांना सहा ते सात तास लागत आहेत. यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे.

महामार्गावरील खड्डे बुजवून मार्गाच्या दुरुस्तीसाठी नुकतेच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्याचवेळी कसारा घाटात मुंबईकडून नाशिककडे येण्याच्या मार्गावर 200 फूट अंतरावर मोठमोठे तडे गेले आहेत. या तड्यांमुळे मार्गाला एक फुटापेक्षा अधिक रुंदीच्या भेगा पडल्या आहेत. या फटींमध्ये वाहने फसण्याचा धोका असल्याने महामार्ग प्राधिकरणने बॅरिकेड लावून वाहतूक वळवली आहे. यामुळे कसारा घाटातील वाहतुकीचा वेग आणखी मंदावणार आहे.

मुंबई - नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 असलेल्या मुख्य महामर्गला अक्षरशः तडे गेले असून घाटातील हा रस्ता खचण्याच्या मार्गावर आहे. दोन वर्षांपूर्वी हाच रस्ता पूर्ण खचला होता. आताही तीच परिस्थिती उद्भवली असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल प्रशासन नेमके दोन वर्षांपासून करताय काय हा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे.

तीन वर्षांपूर्वीही तडे

मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटात याच ठिकाणी तीन वर्षांपूर्वी रस्त्याला तडे गेले होते. कसारा घाटातील रस्ता संवेदनशील आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्याला तीन वर्षात पुन्हा तडे गेल्याने त्याच्या कामाचा दर्जा चर्चेत आला आहे.

आठवडाभर निरीक्षण करणार

सध्या कसारा घाटात तडे गेलेल्या 200 फूट भागात बॅरिकेड लावले असून, आठवडाभर त्याचे निरीक्षण केले जाईल. पाऊस उघडल्यानंतर रस्ता दुरुस्त केला जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके यांनी 'टेंडरनामा'ला सांगितले.