Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Tendernama
उत्तर महाराष्ट्र

छगन भुजबळांचा एल्गार! ...तर 1 नोव्हेंबरपासून टोल बंद आंदोलन!

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गाची (Mumbai - Agra National Highway) मुंबई ते नाशिक (Mumbai - Nashik) दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या महामार्गाची 31ऑक्टोबरपर्यंत सुधारणा झाली नाही, तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या (NHAI) अधिकाऱ्यांना दिला आहे. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सज्जड दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

संपूर्ण पावसाळ्यात मुंबई - आग्रा महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून, त्यामुळे वाहन चालकांना या मार्गावरून जाताना प्रचंड त्रास होत आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने त्यात फसत असून, अनेक अपघात झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरवातीला खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजवले. मात्र, त्या पेव्हर ब्लॉकभोवती मोठमोठे खड्डे पडले. यामुळे पेव्हर ब्लॉकची आणखी अडचण होऊन त्या खड्ड्यांमध्ये अनेकदा वाहने फसून अपघात झाले.

मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्राधिकरणचे संचालक साळुंके यांनी खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांत काम पूर्ण होईल, असे उत्तर दिले होते. त्यावेळी आमदारांनी विरोध करीत खड्डे कायम असून, अधिकारी खोटे बोलत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यावर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या मार्गावरील परिस्थिती जैसे थे असल्याने दाखवून देण्यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (ता. 19)  नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी केली.

यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंके, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके आदी उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्डे दाखवले व विचारणा केली. अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास १ नोव्हेंबर पासून टोल बंद आंदोलनाचा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.

तीन ठिकाणी टोल

नाशिकहून मुंबईला जाईपर्यंत तीन ठिकाणी टोल द्यावा लागत आहे. चारचाकी वाहनांना नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी 200 पेक्षा अधिक रुपये मोजावे लागत असूनही टोल वसूल करणाऱ्या कंपनीकडून रस्ते दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केले जाते. यामुळे रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत टोल न देण्याच्या भूमिकेमुळे वेळेत महामार्ग दुरुस्ती होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.