Contractor
Contractor Tendernama
उत्तर महाराष्ट्र

मोठी बातमी; ठेकेदारांना बिड क्षमता नसतानाही मिळणार 'ही' कामे...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : 'मिशन जलजीवन'ची (Mission Jal Jeevan) कामे वेगाने व लवकर पूर्ण व्हावेत म्हणून पाणी पुरवठा विभागाकडून नियमांमध्ये शिथिलता दिली जात आहे. मागील महिन्यात इतर विभागांकडे नोंदणी केलेल्या ठेकेदारांना (Contractors) जलजीवनच्या टेंडरमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली. मात्र, त्याचा काहीही उपयोग न झाल्याने आता दीड कोटीपर्यंतच्या कामांसाठी टेंडर (Tender) भरताना बीड क्षमतेची अट पाणी पुरवठा विभागाने रद्द केली आहे. तसेच एकाच वर्षात तीन कामे घेतलेल्या ठेकेदारांना पुढील टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी बिड क्षमतेची अट असून त्यातही त्यांना टेंडर भरता यावे म्हणून बिड क्षमता पाच पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कामे लवकर पूर्ण होतील, असे विभागाचे म्हणणे आहे.

राज्यात मिशन जलजीवन अंतर्गत जवळपास 15 हजार कोटींची कामे सुरू असून नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून 1300 कोटींची कामे प्रस्तावित आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे नोंदणी केलेले व काम केल्याचा अनुभव असलेले ठेकेदार या नळ पाणी पुरवठा कामांसाठी टेंडर भरू शकतात. मात्र, ठेकेदारांची संख्या मर्यादित व कामांची संख्या अधिक यामुळे एकेका ठेकेदाराला अनेक कामे दिली गेली. या ठेकेदारांची बिड क्षमता संपल्यानंतर कामे कोणाला द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर पाणी पुरवठा विभागाने जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे नोंदणी केलेल्या तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना टेंडरमध्ये सहभागी होण्यास परवानगी देणारे परिपत्रक 4 ऑगस्टला निर्गमित केले. त्यानंतर  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्ध केलेल्या 247 टेंडरपैकी 50 टेंडरमध्ये एकही ठेकेदार पात्र न ठरल्याने ती सर्व टेंडर पुन्हा बोलावण्याची नामुष्की आली. जॉईंट व्हेंचर करताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या नोंदणीकृत ठेकेदाराची बिड क्षमता संपलेली असल्यास ते टेंडर अपात्र ठरवले तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्याकडे अनुभवाचा दाखला नसल्याने त्यांना अपात्र ठरवले.

यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला पत्र लिहून बिड क्षमता वाढवण्याची विनंती केली होती. या पत्राची दखल घेऊन पाणी पुरवठा विभागाने तीन अटी शिथिल केल्या आहेत. यात दीड कोटी पर्यंतच्या कोणत्याही कामांना बिड क्षमतेची अट असणार नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून साधारणपणे एक कोटींपर्यंतच्या योजना राबवल्या जातात. यामुळे मिशन जलजीवनची कामे करताना आता सर्व ठेकेदारांना टेंडर भरता येणार आहे. तसेच एका वर्षात तीनपेक्षा अधिक कामे घेतलीअसतील तरच बिड क्षमता तपासली जाणार असून त्यासाठी ठेकेदारांच्या सध्याच्या बिड क्षमतेत पाच पटीने वाढ केली आहे. दरम्यान ही सर्व शिथिलता केवळ या वर्षी डिसेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचेही परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी गुड न्यूज

राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने यापूर्वी 4 ऑगस्टला परिपत्रक काढून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जलजीवनची कामे घेण्यास परवानगी दिली होती. मात्र, टेंडरमध्ये अनुभवाचा दाखला मागवला होता. त्यामुळे हे ठेकेदार अपात्र ठरले होते. विभागाने आता यात शिथिलता दिली आहे.  यापुढे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना अनुभवाची अट असणार नाही. तसेच दीड कोटीपर्यंत बिड क्षमता तपासली जाणार नाही. यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची जल जीवनची कामे करू शकणार आहेत.