New Katraj Tunnel
New Katraj Tunnel Tendernama
पुणे

जपानी तज्ज्ञ रोखणार का कात्रजचा बोगदा कोसळण्यापासून?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर असलेला कात्रजचा शिंदेवाडीजवळील नवा बोगदा (New Katraj Tunnel) सततच्या दुर्घटनांमुळे धोकादायक बनल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील काही दिवसांत दरड कोसळण्याच्या घटनांमुळे या बोगद्यातून प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होत असून, जीवित हाणीचे प्रमाणही मोठे आहे. मात्र, असे असूनही या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (National Highway Authority Of India) ठोस उपययोजना करण्यात अपयश आले आहे. या संदर्भातील शुक्रवारी आयोजित बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरड आणि दगड कोसळणे, पावसामुळे गळणारे पाणी या कारणांमुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रजचा शिंदेवाडीजवळील नवा बोगदा धोकादायक बनल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे तातडीने उपययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर एनएचएआयने जपानमधील तज्ज्ञांना सुरक्षेच्या उपाययोजना शोधण्यासाठी पाचारण केले आहे. जपानी पथकाने सुचविलेल्या उपाययोजनांची त्वरीत अंमलबजावणी करण्यासाठी एनएचएआयने शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले आहे.

शिंदेवाडी बोगद्याजवळ वारंवार अपघात होतात. तसेच तेथे पाणी साठून अनेकदा दुर्घटनाही झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोगद्याला आता गळतीचे आणि दरड कोसळण्याचे ग्रहण लागले आहे. कात्रजचा नवीन व खंबाटकी या दोन्ही बोगद्यांच्या कामाची पाहणी करून शुक्रवारच्या बैठकीत आवश्यक त्या सूचना देणार आहेत. बोगद्यातून दररोज सुमारे ५० हजार वाहनांची वाहतूक होते.

महामार्गावर खंबाटकी घाटात ६ लेनचा नवीन बोगदा बांधला जात आहे. ६ किलोमीटरच्या या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांच्या वेळेत १५ ते २० मिनिटांची बचत होईल. अल्पावधीत त्याचे काम पूर्ण होणार आहे. गुरुवारी जपानच्या ‘जायका’ या संस्थेच्या बोगद्याचे तज्ज्ञ असलेल्या पथकांनी त्याचीही पाहणी केली. यात बोगद्याच्या स्ट्रक्चरसह अन्य तांत्रिक बाबीदेखील पाहण्यात आल्या.

चौपदरीकरणाचे काम कधी पूर्ण होणार?

पुणे-सातारा रस्ता यापूर्वी दोन पदरी होता. त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने ४ फेबुवारी १९९९ रोजी अधिसूचना काढली. त्यावेळी याचा खर्च ६१० कोटी रुपये झाला. २००४ मध्ये काम पूर्ण झाल्यावर आणेवाडी (सातारा) येथे ४ मार्च २००५ आणि खेड शिवापूर (पुणे) येथे ८ मार्च २००६ रोजी टोल सुरू झाला. हा रस्ता सहापदरी करण्याचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. ते मार्च २०१३पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ते अद्याप पूर्ण झालेले नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही त्याबाबत वारंवार जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे.