Vande Bharat Express
Vande Bharat Express Tendernama
पुणे

रेल्वेचा स्पीड वाढतोय; दौंड ते लोणावळा अवघ्या सव्वादोन तासांत!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लोणावळा - पुणे - दौंड या मार्गावर तब्बल ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाडीतून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकांवरून (Pune Railway Station) काही महिन्यांतच ‘वंदे भारत’सह (Vande Bharat) अन्य महत्त्वाच्या रेल्वे ताशी १६० किमी वेगाने धावतील. रेल्वे प्रशासनाने त्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॅकचे अपग्रेडेशन काम सुरू केले. दौंड ते लोणावळा या प्रवासाला सध्या तीन तास लागत असले तरी रेल्वे गाड्यांचा वेग वाढल्यानंतर हेच अंतर अवघ्या सव्वादोन तासांत कापने शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

शिवाय दौंड ते लोणावळा दरम्यान १३९ किमीच्या रेल्वे मार्गांवर रुळांच्या दोन्ही बाजूने सुमारे दोन मीटर उंचीची सुरक्षाभिंत बांधली जात आहे. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या मार्गात अडथळे निर्माण होणार नाहीत. ट्रॅकचे अपग्रेडेशन करताना पहिल्या टप्यात त्याची क्षमता ११० हून १३० किमी इतकी जाईल. दुसऱ्या टप्यात याची क्षमता ताशी १६० किमी वेगाने रेल्वे धावेल. त्यामुळे रेल्वे प्रवास गतिमान होईल तसेच प्रवाशांच्या वेळेतही मोठी बचत होणार आहे.

रेल्वे प्रवास वेगवान व सुरक्षित व्हावा, या करीता विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. ‘वंदे भारत’च्या डब्याचे उत्पादन असो वा रुळांच्या सुरक्षेसाठी थिकवेब स्वीच बसविणे असो. असे वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मुंबई - चेन्नई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान व्हावा, यासाठी हा मार्ग ताशी १६० किमीसाठी तयार केला जात आहे. तेव्हा मेल एक्स्प्रेस गाड्या देखील ताशी १६० किमीने धावतील.

सुरक्षा भिंतीसाठी १०० कोटींचा खर्च
रेल्वे जर ताशी १३० किमी वेगाने धावत असेल तर त्यासाठी रुळांच्या बाजूने सुरक्षाभिंत असणे आवश्यक नाही. मात्र, वेग जर १६० किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा मात्र सुरक्षा भिंत असणे अनिवार्य आहे. अनेकदा रेल्वे धावत असताना शेळ्या, मेंढी, म्हैस रेल्वे खाली येऊन छोटे मोठे अपघात घडतात. तर कधी यामुळे रेल्वेला तासनतास थांबून राहावे लागते. नुकतेच वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीत हे दोन वेळेस घडले आहे. त्यामुळे केवळ रेल्वे इंजिनचेच नाही तर प्रवाशांच्या वेळेचे देखील मोठे नुकसान होते. हे लक्षात घेता रेल्वेच्या वेगात बाधा निर्माण करणाऱ्या गोष्टी रेल्वेपासून दूर राहाव्यात म्हणून सुमारे १०० कोटी रुपये खर्चून सुरक्षा भिंत बांधली जात आहे. हडपसर व लोणी स्थानकाच्या परिसरात भिंत बांधण्याचे काम सुरु झाले आहे.

पुणे रेल्वे विभागात सध्या विविध कामे सुरु आहेत. दौंड - लोणावळा दरम्यानचा रेल्वे मार्ग ताशी १६० किमींसाठी तयार केला जात आहे. यासाठी सुरक्षा भिंतदेखील बांधली जात आहे. हे होताच रेल्वे १६० किमी वेगाने धावेल.
- बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे