Khadakwasla Dam Pune
Khadakwasla Dam Pune Tendernama
पुणे

धक्कादायक! खडकवासला धरणाच्या चारपट पाण्याची दरवर्षी होतेय गळती

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरासाठी खडकवासला प्रकल्पातून (Khadakwasla Project) उपलब्ध होणाऱ्या पाणी पुरवठ्यापैकी दरवर्षी तब्बल आठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीगळती होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा अर्थ खडकवासला धरण चार वेळेस पूर्ण क्षमतेने भरेल किंवा शहराला चार महिने पुरेल इतक्या भरमसाट पाण्याची गळती होत आहे.

पुणे शहराला वरसगाव, खडकवासला, पानशेत आणि टेमघर या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दरवर्षी खडकवासला प्रकल्पातून २०.९४ टीएमसी, पवनाच्या रावेत बंधाऱ्यातून ०.४० टीएमसी आणि भामा आसखेड धरणातून १.८० टीएमसी असे एकूण २३.१४ टीएमसी पाणी घेत आहे. त्यापैकी आठ टीएमसी पाण्याची गळती होत असल्याची बाब कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत समोर आली. परंतु एवढे पाणी नेमके कोठे जात आहे, याचा अभ्यास करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच, सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करून ते पाणी शेतीला दिल्यास शहरातील पाणीपुरवठा आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

महापालिकेने जलसंपदा विभागाला दिलेल्या पत्रानुसार, पुणे शहराची १ जुलै २०२१ नुसार नियमित लोकसंख्या ५५.२७ लाख इतकी आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा ४५ हजार, शहरालगतची ग्रामीण भागातील लोकसंख्या १०.९२ लाख आणि तरती लोकसंख्या २.७६ लाख अशी एकूण लोकसंख्या ६९ लाख ४१ हजार इतकी दर्शविली आहे. दररोज १४३६ एमएलडी (एक अब्ज ४३ कोटी ६० लाख लिटर) सांडपाणी तयार होते. सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता ५६७ एमएलडी आहे. प्रत्यक्षात ५०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. तर, ९३६ एमएलडी सांडपाणी विनाप्रक्रिया मुळा-मुठा नदीत सोडले जाते. सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करून ते पाणी शेतीला देणे शक्य होणार आहे. (एक एमएलडी म्हणजे दहा लाख लिटर)

पुणे महापालिकेने पाणीगळती रोखण्यासोबतच सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी दिले पाहिजे. निर्धारित मापदंडानुसार प्रतिमाणसी पाणीवापर १५५ लिटर इतका आहे. परंतु सध्या २७० लिटर पाणीवापर केला जातो. तो मर्यादित करून काटकसरीने पाणीवापर करणे गरजेचे आहे.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

पुणे शहरात ४० टक्के पाणीगळती होत असून, ती कमी करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सुधारणा सुरू आहेत. यामध्ये नव्या जलवाहिन्या टाकणे, मीटरद्वारे पाण्याचे मोजमाप याचा समावेश आहे. त्यामुळे पाणीगळती होत असलेल्या भागात उपाययोजना शक्य होणार आहेत. ही गळती ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा प्रमुख, पुणे महापालिका