Water Tunnel
Water Tunnel Tendernama
पुणे

Pune : पालिकेच्या दुहेरी फायद्याच्या 'त्या' प्रकल्पात आता अतिक्रमणांचा खोडा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान होणाऱ्या सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या बंद कालव्यासाठी महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले. यात ७ लाख ७७ हजार ३२९ चौरस मीटर जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले आहे. कालवा बंद करून बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पामुळे मोकळ्या होणाऱ्या एकूण जागेच्या दहा टक्क्यांहून अधिक जागेवर अतिक्रमण असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान कालवा बंद करून बोगद्यातून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाने तयार केली आहे. या प्रकल्पाच्या अहवालाला राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारच्या स्तरावर पडून आहे. सुमारे दीड हजार कोटींची ही योजना आहे. या योजनेमुळे अडीच टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी आशियाई बँकेने कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे.

दरम्यान, प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होण्यास किमान तीन वर्षे लागतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कालव्यालगत सुमारे ५०० मीटर ते एक किलोमीटर जागा उपलब्ध होणार आहे. या जागेचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी करता येणे शक्य आहे. त्यातील काही भाग महापालिका आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत येतो. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करता येईल. त्यांच्या माध्यमातून काही निधी उभारता येईल का, याची चाचपणी करण्याचा आदेश मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.

त्यानुसार महापालिकेने याचे सर्वेक्षण करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती. संबंधित सल्लागार कंपनीने सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या कालव्याचे सर्वेक्षण करून अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीदेखील अहवाल प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. या अहवालातील माहितीवरून बंद कालव्याच्या दहा टक्के जागेवर अतिक्रमण असल्याची गोष्ट निदर्शनास आली आहे.

महापालिकेचा दुहेरी फायदा

खडकवासला धरणापासून फुरसुंगीतील महापालिकेच्या हद्दीपर्यंतचा कालवा आणि त्यांच्या दोन्ही बाजूच्या जागेचे सर्व्हेक्षण करण्यात करण्यात आले. कालवा बंद केल्यानंतर सुमारे ६५ लाख १९ हजार ४८५.४५ चौरस मीटर जागा उपलब्ध होऊ शकते. त्यापैकी ७ लाख ७७ हजार ३२९.९१ चौरस मीटर जागेवर अतिक्रमण असल्याचे दिसून आले. सर्व्हेक्षण करताना शेतीसाठी पाणी सोडण्यात येणारा कालवा आणि खडकवासला ते पर्वती यादरम्यान बेबी कॅनॉलमधून टाकण्यात आलेल्या जलवाहिनी अशा दोन्ही कालव्यांच्या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे महापालिकेचा दुहेरी फायदा होणार आहे. बोगद्यातून पाणी नेण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कालव्याची जागा अन्य कारणांसाठी वापरण्यास उपलब्ध होणार आहे, तर पाण्याची सुमारे दोन टीएमसी बचत होणार आहे.

जागा ताब्यात घेण्याआधी अतिक्रमणे हटवावी लागणार

कालवा आणि कालव्याच्या दोन्ही बाजूची जागा ही जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात खडकवासला धरणाच्या भिंतीपासून फुरसुंगीपर्यंत कालव्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे ही जागा महापालिकेला ताब्यात घेताना सर्वप्रथम ही अतिक्रमणे काढावी लागणार आहे. तरच त्या जागेचा वापर अन्य कारणांसाठी करणे शक्य होणार आहे.