पुणे (Pune) : गणपती माथा ते वारजे उड्डाणपूल या एनडीए रस्त्यावर (NDA Road) दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याला कोणताच पर्याय नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने व महापालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे येथील नागरिकांनी केली आहे.
यामध्ये काही ठिकाणी कमी रुंदी तर ज्या ठिकाणी रुंदी आहे अशा ठिकाणी व्यवसायिकांनी रस्ता व्यापला आहे. त्यामुळे गर्दीत आणखीनच भर पडते. येथील मुख्य उड्डाणपुलाजवळ आणि वारजे माळवाडी बसस्थानकाजवळ दररोज सकाळी, सायंकाळी वाहनांची गर्दी पाहावयास मिळते.
माळवाडी बस स्थानाकावर बस थांबली की, मागे गणपती माथ्यापर्यंत वाहतूक कोंडी होत असते. येथे अरुंद रस्ता असल्याने वाहन थांबल्यानंतर दुसऱ्या वाहनांना पुढे जाताच येत नाही. जवळच वारजे वाहतूक विभागाचे कार्यालय आहे.
वाहतूक पोलिस कर्तव्य बजावत असूनही नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याला मुख्य कारण म्हणजे अनेक वर्षांपासून गणपती माथा ते वारजे उड्डाणपूल येथील रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण आहे. रुंदीकरण होत नसल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागतात. त्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
मी दररोज या रस्त्याने प्रवास करतो. मात्र गणपती माथा ते वारजे उड्डाणपूल म्हटले की अंगावर काटा येतो. दोन मिनिटाच्या अंतरासाठी ३० मिनिटे लागतात. महापालिकेने याची दखल घ्यावी.
- बाबाजी वाघ, स्थानिक नागरिक
गणपती माथा ते वारजे उड्डाणपूल येथे प्रचंड गर्दी पहायला मिळते. मात्र या गर्दीमुळे वाहनच पुढे सरकत नाही. तरी वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने पहावे.
- संजय भोर, स्थानिक नागरिक
अनधिकृत टपऱ्यावर कारवाई करून वाहतूक सुरळीत केली जाईल. नागरिकांनी वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने वाहने लावू नयेत.
- राजेश गुर्रम, सहायक आयुक्त, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय