PMC
PMC Tendernama
पुणे

Pune: अभियंत्यांच्या बदल्यांचा 'या' महत्त्वाच्या प्रकल्पाला फटका

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील नदी स्वच्छ करण्यासाठी व मैलापाण्याची समस्या सोडविण्यासाठी १४७३ कोटी रुपये खर्च करून ‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे (जायका प्रकल्प) प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी तब्बल सहा वर्ष वाट पहावी लागली. त्यानंतर आता काम सुरू झाले असले तरी या प्रकल्पातील अडथळ्यांची शर्यत संपलेली नाही. या प्रकल्पासाठी खास तयार केलेल्या कक्षातील अभियंत्यांच्या बदल्यांना अवघ्या काही महिन्यात सुरवात झाल्याने थेट प्रकल्पाच्या कामावरच परिणाम होत आहे.

या प्रकल्पाच्या ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आणि ५६ किलोमीटरची मलवाहिनी टाकली जाणार आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने ‘प्रकल्प अंमलबजावणी कक्ष’ (प्रोजेक्ट इंप्लिमेंटेशन युनिट-पीआययू) तयार केला आहे. त्यात ३३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे, हा प्रकल्प पूर्ण होई पर्यंत यातील एकाही अधिकाऱ्यांची बदली करू नये, अपवादात्मक स्थितीत बदली केली तर त्यासाठी आयुक्तांची मान्यता घ्यावी असे आदेश २५ मार्च २०२२ रोजी आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले होते. तसेच या ३३ अधिकाऱ्यांची यादी केंद्र सरकारलाही पाठविण्यात आली आहे.

सध्या या प्रकल्पाचे मलवाहिनी टाकण्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तर नायडू, भैरोबा आणि धानोरी येथील मैलाशुद्धिकरण प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. उर्वरित ठिकाणचे कामाचे अंतिम आराखडे मंजूर झालेले आहेत. त्यामुळे शहरात एकाच वेळी अनेक ठिकाणी काम चालणार असल्याने त्यावर दैनंदिन देखरेख ठेवणे आवश्‍यक आहे. पण ३३ पैकी नऊ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहे. तसेच अतिरिक्त कार्यभार दिला असला तरी प्रत्यक्षात काम सुरू होत असताना उप अभियंता, कनिष्ठ अभियंता तेथे उपस्थित नसतील तर त्याचा परिणाम कामावर होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

जे अधिकारी अनेक वर्ष एकाच जागेवर होते त्यांची बदली केली आहे. पण त्यांचे जायकाचे काम काढलेले नाही. या अधिकाऱ्यांनी दोन्ही विभागात काम करावे लागणार आहे. इतर अधिकाऱ्यांकडे ही अतिरिक्त कार्यभार आहे.
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका