Vatal Hill, Balbharti To Paud Phata Road
Vatal Hill, Balbharti To Paud Phata Road  Tendernama
पुणे

Pune: धक्कादायक! विरोध झुगारून देत पालिका काढणार टेंडर?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वेताळ टेकडीवरील (Vetal Tekdi) बालभारती ते पौड फाटा रस्ता (Balbharti - Paud Phata Road) प्रकल्पाला विरोध असून, त्याला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्याच्या टेंडरसाठी (Tender) पुढील दोन आठवड्यांत अटी व शर्ती निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने या प्रकल्पास विरोध करत या प्रकल्पापेक्षा सेनापती बापट रस्ता ते कोथरूड या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी केली.

पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपये खर्च करून बालभारती ते पौड फाटा यादरम्यान वेताळ टेकडीवरून नवीन रस्ता आखला आहे. पण या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येत असल्याने त्यास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध केला आहे. त्यासाठी विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणीही केली आहे.

मनसे जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस, सरचिटणीस अनिल राणे, उपाध्यक्ष विशाल शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागस्कर यांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. या प्रकल्पामुळे विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कमी होणार नाही, केवळ १२ टक्के कोंडी सुटणार आहे. या रस्त्यामुळे निधीचा अपव्यय, पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याने प्रकल्प फायदेशीर नाही. त्यामुळे तो रद्द करावा. त्यापेक्षा हा निधी या भागातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी वापरावा, पीएमपी व्यवस्था सुधारावी, अशी या वेळी त्यांनी केली.

या प्रकल्पाचे टेंडर रद्द केलेले नाही, टेंडरच्या अटी व शर्ती निश्चित‍ करण्याचे काम सुरू आहे. त्याला दोन आठवडे लागतील, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, आंदोलकांकडून टेंडर रद्द झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमीका मांडली जात असून त्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी, मनसेकडून पाठिंबा दिला जात असल्याने नेमके काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

रस्ता हवा; पण बोगदा नको
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते नीलेश निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पास वैयक्तिक पाठिंबा जाहीर केला. १९९७ पासून या प्रकल्पासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. २५ मिनिटांचा प्रवास अवघ्या तीन मिनिटांत पूर्ण होईल, यामुळे इंधन, पैशांची बचत होईल, विधी महाविद्यालय रस्त्यावरील २० गल्ल्यांमधील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. प्रदूषण कमी होईल यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र पंचवटी-सुतारदरा-गोखलेनगर हा बोगदा करू नये. या प्रकल्पामुळे पानशेत पूरग्रस्तांची घरे तोडावी लागतील. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असा दावा निकम यांनी केला.