Ajit Pawar
Ajit Pawar Tendernama
पुणे

Pune : अजितदादांनी हिरवा कंदील दिल्याने आता खडकवासल्यातून...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : खडकवासला धरण (Khadakwasla Dam) ते फुरसुंगी बोगदा दरम्यान प्रस्तावित असलेल्या २८ किलोमीटर लांबीच्या कालव्याचा अहवाल जलसंपदा विभागाकडून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. या समितीकडून अहवालाची छाननी सुरू करण्यात आली. समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगदा या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी टेंडर काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी सध्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडून त्यांची छाननी पूर्ण करून हा अहवाल तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. या समितीने प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य शासनाची मान्यता घेऊन तातडीने कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच पाणी गळती कमी होऊन शेतीलादेखील पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

टीडीआरबाबत चाचपणी सुरू

खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर असलेल्या कालव्याच्या जागेचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी करता येणे शक्य आहे. त्यातील काही भाग महापालिका व पीएमआरडीए हद्दीत येतो. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जागा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करावी, याचा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे. तसेच यातून जलसंपदा विभागाला अतिरिक्त हस्तांतरण विकास हक्क (TDR) मिळेल किंवा कसे, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.

खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बंद कालव्यातून पाणी नेण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत करण्यात आले. प्रस्तावाला पवार यांनी देखील अनुकूलता दर्शविली आहे. निधीबाबत वित्त विभागाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल.

- ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे