Traffic
Traffic  Tendernama
पुणे

Pune : काहीही करा पण आमचा त्रास कमी करा! विद्यापीठ चौकातील कोंडीला का वैतागले पुणेकर?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिका प्रशासनाने अतिक्रमणे दूर करून रस्त्यांचे रुंदीकरण करावे. भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून नियोजनबद्ध पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली तरच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. तसेच, प्रत्येक वाहतूक विभागाच्या (डिव्हिजन) अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील पोलिस कर्मचारी आणि वॉर्डनच्या मदतीने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना वाहनचालकांनी केल्या.

शिवाजीनगर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान आचार्य आनंदऋषीजी चौकात तसेच पाषाण, औंध, बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. या संदर्भात काही निवडक प्रतिक्रिया...

वाहतूक कोंडी होण्यामागे अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाढती वाहने आणि लोकसंख्या हे खरे कारण आहे. कितीही उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधले तरी वाहतूक कोंडी होणारच. त्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हा एकच उपाय आहे. सरकारने मेट्रो किंवा तत्सम पर्याय उपलब्ध करून खासगी वाहनांवर नियंत्रण आणावे. त्यामुळे प्रदूषण आणि मानसिक त्रासही कमी होईल. वनाज ते रूबी हॉल क्लिनिक मार्गावर मेट्रोने प्रवास करताना रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीचा त्रास झाला नाही.
- ऋग्वेद दीक्षित, वारजे

शहरात वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते अशा कारणांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासन नागरिकांकडून कोट्यवधींचा कर वसूल करते, मग चांगले रस्ते, पायाभूत सुविधा उपलब्ध करून का देत नाही? वाहतूक पोलिसांनी कोंडीच्या ठिकाणी पोलिस आणि वॉर्डन नेमावेत.
- प्रशांत गायकवाड, पुणे

पाषाणकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे येताना दररोज सायंकाळी ५ ते १० आणि सकाळी ९ ते ११ या कालावधीत दोन लेन करण्यात याव्यात, तरच वाहतूक कोंडी सुटेल. पोलिसांनी वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता नियमनाकडे अधिक लक्ष दिल्यास वाहतूक सुरळीत होईल.
- भूषण क्षीरसागर, पुणे

‘पीएमआरडीए’कडून मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पुरेसे वॉर्डन देणे गरजेचे आहे. तसेच, महापालिकेने शिवाजीनगर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून वेळीच रस्ता रुंदीकरण करणे अपेक्षित होते. वेळीच रुंदीकरणाचे काम सुरू केले असते, तर वाहतूक कोंडीचा त्रास झाला नसता.
- प्रसाद शिंदे, बाणेर

महापालिका, ‘पीएमआरडीए’, वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर ते औंध, पाषाण आणि बाणेरपर्यंत रस्त्यांची पाहणी करावी. आवश्यक ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात. बाणेर रस्ता, सकाळ नगरसमोरील रस्ता अरुंद झाल्यामुळे पदपथाचा आकार कमी करावा. सेनापती बापट रस्त्याकडे वळताना चौकात पुरेसे वाहतूक पोलिस आणि वॉर्डनची नेमणूक करावी.
- सुरेंद्र जनबंधू, पुणे