Talegaon MIDC
Talegaon MIDC Tendernama
पुणे

गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावला; मावळात संताप

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महाराष्ट्रातील तळेगाव (Talegaon, Maharashtra येथे प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) कंपनीचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प गुजरातमध्ये (Gujrat) गेल्यामुळे आमचा रोजगार हिरावला गेल्याची प्रतिक्रिया मावळमधील (Maval) नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

न्हावाशेवा बंदर, मुंबई विमानतळ, पुणे-मुंबई लोहमार्ग, महामार्ग, द्रुतगती मार्गामुळे तळेगाव जगाशी जोडले गेले आहे. हवामान, नैसर्गिक वातावरण आणि पायाभूत सुविधांमुळे जगातील उद्योजकांची तळेगावला पहिली पसंती आहे. येथील एमआयडीसीने उद्योगविश्वाच्या नकाशावर ठसा उमटवला आहे. टप्पा एक व दोनमधील बड्या उद्योगांकडून याची प्रचिती येते.

नुकतेच भूसंपादन झालेल्या टप्पा क्रमांक पाचमध्ये जागा मिळावी यासाठी बरेच उद्योजक प्रतीक्षेत आहेत. याच पार्श्वभूमीवर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसह एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि वेदांता-फॉक्सकॉनच्या शिष्टमंडळाच्या भेटीत तळेगाव एमआयडीसीत सेमीकंडक्टर प्रकल्प होणार असल्याचे शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे मावळातील युवा वर्गासह उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, अवघ्या दीड महिन्यातच प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यावर मावळातील उत्साहावर विरजण पडले आहे. यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्या इलेक्ट्रॉनिक सिटीत येऊ घातलेले बरेच पूरक उद्योग आपोआप गुजरातमध्ये जाणार यात शंका नाही.

महाराष्ट्र सरकारने प्रकल्प जाहीर केल्यानंतर आशा पल्लवित झालेल्या बऱ्याच पूरक उद्योगांनी लगतच्या तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रात आपले प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली होती. त्यांचाही भ्रमनिरास झाला असून मावळातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

उद्योग महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये जावेत यासाठी महाराष्ट्रातीलच काही राजकीय नेते प्रयत्नशील असल्याचे जाणवत होते. तसा आरोप याअगोदरच्या उद्योग मंत्र्यानी देखील उघडपणे केला होता. खूपच खेदजनक आहे.

- महेश महाजन, उद्योजक, तळेगाव दाभाडे

एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याबाबत धक्का वाटायचे कारणच नाही. हे अपेक्षितच होते. महाराष्ट्रातील बरेच असे उद्योग, व्यापार गुजरातला पळवले गेलेत. आपण महाराष्ट्रातील लोक फक्त पाहत बसणार.

- श्रीकांत वायकर, उद्योजक, वडगाव मावळ

हजारो उद्योजकांचे भूखंडासाठीचे अर्ज एमआयडीसीकडे पडून आहेत. मात्र, प्रशासन लक्ष देत नाही. सपाट जमीन, मुबलक पाणी, वीज उपलब्ध असतानाही प्रकल्प राज्याबाहेर जाणे याला निष्क्रिय प्रशासन व राजकीय अनास्था कारणीभूत आहे.

- रामदास काकडे, उद्योजक, तळेगाव दाभाडे

‘वेदांता-फॉक्सकॉन’साठी आंबळेतील जमीन निश्चित करून पन्नास टक्के भूसंपादन झाले आहे. विरोध नसताना प्रकल्प जाणे हा भूमीपुत्रांवर अन्याय आहे. मतभेद बाजूला ठेवून प्रकल्पाच्या पुर्नप्रस्थापनेसाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे.

- सुनील शेळके, आमदार, मावळ