Navale Bridge
Navale Bridge Tendernama
पुणे

काहीही करा पण नागरिकांचे जीव वाचवा!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महामार्गावर नवले पुलाजवळ (Navale Bridge) होत असलेले अपघात (Accident) थांबलेच पाहिजेत. टेंडर मागवू, प्रकल्प अहवाल तयार करू, मंजुरी घेऊ, अशी कारणे सांगू नका. त्यासाठी अल्पावधीत शक्य असलेल्या उपायांची तातडीने अंमलबजावणी करा, अशा शब्दांत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपघात रोखण्याच्या उपायांचा आराखडा तयार करून त्याची आठ दिवसांत अंमलबजावणी करण्यासही त्यांनी बजावले.

या महामार्गावर रविवारी तीन गंभीर अपघात झाले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याचा आदेश यंत्रणांना दिला. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयात सोमवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे (एनएचआयए) प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक नियोजन शाखेचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आम्हाला नागरिकांचे जीव महत्त्वाचे आहेत. पूर्वी केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या सहा महिन्यांत येथील अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र पुन्हा एकदा अपघातांची संख्या वाढत आहे. अपघात कमी करण्यासाठी शासकीय यंत्रणांतील समन्वय वाढविणार आहोत.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे