BRT
BRT Tendernama
पुणे

वाढत्या खासगी गाड्यांमुळे पुण्यात कोंडी; तज्ज्ञांनी कान टोचले

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी नव्हे, वाढती वाहनसंख्या कारणीभूत आहे, अशा शब्दांत शहरातील वाहतूक नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे कान टोचले.

शहरातील वाहतुकीची कोंडी हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी पोलिस आयुक्तांनी त्याचे खापर बीआरटी व सायकल ट्रॅकवर फोडले आहे. तर महापालिकेने तेच खापर ‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पावर फोडून हात वर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मूळ प्रश्‍नावर उत्तर शोधण्याऐवजी काही हजार कोटी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या योजनांवर दोष ढकलण्याचे काम सुरू आहे. याबाबत शहरात वाहतूक नियोजनावर काम करणाऱ्या एसपीटीएम, परिसर, सीईई या स्वयंसेवी संस्थांनी पोलिस आयुक्तांच्या पत्राचा समाचार घेतला. तसेच, वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी या सूचनेवर आक्षेप घेणारे पत्र पोलिस आयुक्तांना लिहिले आहे.

काय म्हणताहेत तज्ज्ञ?

हर्षद अभ्यंकर, एसपीटीएम :
वाहतूक नियोजन हा महापालिकेच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. पोलिसांना वाहतूक नियोजनाचे प्रशिक्षण नसते, ते अपेक्षितही नसते. पोलिस आयुक्तांच्या पत्रामध्ये ‘बीआरटी स्थानकावर पोचण्यासाठी दरवेळी रस्ता ओलांडावा लागतो’, अशा प्रकारची विधाने आहेत. खरंतर बसने कुठेही जाऊन परत यायचे म्हणजे रस्ता दोनदा ओलांडावा लागतोच. त्यामुळे पोलिस आयुक्तांना बीआरटीचे प्राथमिक ज्ञानही नाही, हे या पत्राद्वारे उघड झाले आहे. दुसरीकडे, मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. म्हणून पोलिसांनी वाहतूक नियोजनापेक्षा पुण्याची वाहतूक शिस्तबद्ध आणि सुरक्षित कशी होईल, यावर विचार आणि योजनाबद्ध कार्यवाही करावी.

प्रांजली देशपांडे, बीआरटी तज्ज्ञ :
दर मिनिटाला दोन बसेस गेल्यास, दोन साध्या लेनमधून जेवढी माणसे प्रवास करतात, त्यापेक्षा एक बीआरटी लेन जास्त माणसे वाहून नेते. खरे म्हणजे असलेली कोंडीच बीआरटीमुळे कमी होऊ शकते. बीआरटी म्हणजे काय हे माहीत असते, तर पोलिस आयुक्तांनी बीआरटीमधील बसेसची संख्या वाढवण्याची आणि बीआरटी मार्गांची डागडुजी करून बीआरटीच्या जाळ्याचा विस्तार करण्याची मागणी केली असती. बीआरटी काढून टाकण्याची सूचना अज्ञानापोटी आली आहे, म्हणून आम्हाला त्याचे आश्चर्य वाटत नाही. त्याचबरोबर, ही चुकीची सूचना नाकारल्याबद्दल महापालिका आयुक्तांनाही त्यांनी धन्यवाद दिले पाहिजेत.

रणजित गाडगीळ, परिसर संस्था :
पुण्यात फारतर १५-२० किमी रस्त्यांवर बीआरटी आहे. त्या बस लेनमधून खासगी वाहने सर्रास जातात. वाहतूक कोंडी इतर शेकडो किमी रस्त्यांवरही होते. मग कोंडीला बीआरटी कारणीभूत कशी? वाहतूक कोंडी ही खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आणि वापरामुळे होते, हे जगमान्य सत्य आहे. वाहतूक नियोजन हा पोलिसांचा विषय नसल्याने हे मूळ कारण पोलिस आयुक्तांना माहीत नसावे असे वाटते. असल्यास, खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा, यासाठी त्यांनी काय केले आहे.

डॉ. संस्कृती मेनन, ‘सीईई’ :
राष्ट्रीय नागरी वाहतूक धोरणामध्ये चालणे, सार्वजनिक वाहतूक आणि सायकलींचा वापर वाढवण्यास शहरांनी प्रोत्साहन द्यावे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. पीएमपी प्रवाशांना उपयुक्त ठरणारी बीआरटी काढून टाकण्याची सूचना करण्यापेक्षा पोलिसांनी पदपथावरील आणि सायकल मार्गांवरील पार्किंगवर, तसेच बीआरटी लेनमध्ये घुसणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई केल्यास त्यांची कृती या धोरणाला अनुसरून राहील.

संस्था, तज्ज्ञांची अपेक्षा
१) पुण्याने पादचारी धोरण, सायकल योजना, पार्किंग धोरण तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी.
२) पोलिस आयुक्तांना वाहतूक नियोजनाविषयी आस्था आणि उत्सुकता असल्यास त्यांनी या धोरणांचा आणि योजनांचा अभ्यास करून महापालिकेच्या प्रयत्नांना साथ द्यावी.
३) पोलिस आयुक्तांना काही माहिती हवी असल्यास ती देण्याची संस्था, तज्ज्ञांची तयारी.