पुणे (Pune) : जगभरात सर्वांत स्वस्त आणि जलद सार्वजनिक वाहतुकीचा यशस्वी ठरलेला प्रकल्प म्हणजे बीआरटी (BRT); परंतु हा प्रकल्प पुण्यातील वाहतुकीसाठी अडथळा ठरतो आहे. त्याबरोबरच सायकल ट्रॅकमुळे रस्त्याची रुंदी कमी होत आहे, असे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून हे दोन्ही प्रकल्प बंद करावेत, जेणेकरून शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी विनंती महापालिकेला केली आहे.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यावर ओरड झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्याची दखल घेत महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्याकडे स्वतंत्र बैठका घेऊन विविध उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या. खड्डेदुरूस्ती, अतिक्रमणे दूर करण्याबरोबरच पीएमआरडीए, महामेट्रो, विविध प्रकल्पांचे ठेकेदार यांच्याकडून ८०० ट्रॅफिक वॉर्डनदेखील महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आले. असे असताना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मात्र या वाहतूक कोंडीचे खापर बीआरटी, सायकल ट्रॅक आणि स्मार्ट सिटी अंतर्गत रुंद करण्यात आलेल्या पदपथांवर फोडले आहे.
पुणे-नगर रस्ता हा राज्य महामार्ग आहे. तर पुणे-सोलापूर व पुणे-सातारा रस्ता हे राष्ट्रीय महामार्ग आहेत. बाहेरील जिल्ह्यांतून मुंबई, नगर, सोलापूर, सातारा या ठिकाणी जाणारी वाहने पुणे शहरातून याच मार्गावरून जात असतात. त्यामुळे या मार्गांवर वाहनांची संख्या जास्त असून, जड वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु याच मार्गांवर बीआरटी योजना राबविल्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग हा केवळ पीएमपी बस करता वापरला जातो. त्यामुळे उर्वरित रस्त्यावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येऊन वाहतूक कोंडीत भर पडते आहे. हा मार्ग केवळ पीएमपी बससाठी करण्यात आला असला, तरी त्यातून इतर वाहनचालकही जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तसेच बीआरटी बस स्टॉप हे रस्त्याच्या मध्यभागी असल्याने थांब्यावर उतारणारे प्रवासी किंवा थांब्यावर जाणारे प्रवासी यांना अनावश्यकरीत्या रस्ता ओलांडून जावे लागते. त्यावेळी पादचाऱ्यांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पादचाऱ्यांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे पोलिस आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यावर पदपथ, त्यानंतर सायकल ट्रॅक करण्यात येतो. परंतु बऱ्याच ठिकाणी सायकल ट्रॅकचा वापर होत नाही. त्यामुळे कॅरेज-वे कमी होऊन वाहतुकीसाठी कमी जागा उपलब्ध होते. रस्त्याच्या मध्यभागी असणारे बीआरटी मार्ग बंद करून संपूर्ण रस्ता वाहतुकीकरिता खुला केल्यास, तसेच अनावश्यक सायकल ट्रॅक काढल्यास सर्व प्रकाराच्या वाहतुकीला अधिक कॅरेज-वे मिळू शकेल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, असेही या पत्रात म्हटले आहे.