नाशिक (Nashik): कोपरगाव–मनमाड–मालेगाव राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरणासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा. या महामार्गावर वाहतुकीचे प्रचंड प्रमाण वाढल्याने शहरातून वाहतूक कोंडी होऊन अपघात वाढत आहेत. यामुळे या मार्गावर येवल्यात उड्डाणपूल उभारण्याऐवजी बाह्यवळण रस्ता करावा, अशी मागणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली आहे.
येवल्यातील राजकारणात भुजबळ विरुद्ध दराडे अशी स्पर्धा असून यापूर्वी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी या महामार्गाबाबत गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर आमदार दराडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन येवल्यात बाह्यवळण रस्ता करण्याची मागणी केली आहे.
दराडे यांनी गडकरी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने कोपरगाव–मनमाड–मालेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरणासाठी ९८० कोटींचा निधी प्रास्तवित केला आहे. या निधी अंतर्गत डीपीआर (प्रकल्प अहवाल) करण्याचे काम सुरू आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरण करताना येवला शहराच्या अर्थकारणाला व उद्योग-व्यवसायाला धक्का पोहोचू नये यासाठी उड्डाणपूल न करता शहराच्या बाहेरून बायपास करण्याची मागणी दराडे यांनी केली.
इकॉनॉमिक कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग ५२ आणि राष्ट्रीय महामार्ग ६१,राष्ट्रीय महामार्ग १६० हा उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी हा उत्तर भारतापासून शिर्डीला जोडणारा जवळचा मार्ग आहे.
या मार्गावरून मालवाहतूक कंटेनर रात्रंदिवस सुरू असतात. तसेच प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असते. छत्रपती संभाजीनगरवरून नाशिककडे जाणारी वाहतूक शिर्डीच्या रस्त्यावर फत्तेबुरुज नाका येथे एकत्र येत असल्याने शहरात प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना तासनतास थांबावे लागत आहे.
शहरातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे शिर्डी आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो. याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीसह प्रमुख बाजारपेठ आहे. येवला, नगरसूल व लासलगावमधून किसान रेल्वे व इतर रेल्वेतून मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक देशात सर्वत्र होते. त्यामुळे शेतमाल वाहतुकीच्या वाहनांची संख्या ही मोठी आहे.
शिवाय येवला देशातील सर्वात मोठे पैठणीचे गाव असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची व ग्राहकांची कायम वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण मजबुतीकरण गरजेचे आहे. शहरातील वर्दळ टाळण्यासाठी उड्डाणपुलाचा पर्याय चुकीचा ठरेल, यामुळे येथील व्यवसाय मंदावतील यावर पर्याय म्हणून शहराच्या बाजूने बायपास करण्यात यावा.
यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून व्यवसायालाही धक्का पोहोचणार नाही असेही दराडे यांनी लक्षात आणून दिले. यावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.