Shivendrasingh Bhosale Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वर-पाचगणीची होणार वाहतूक कोंडीतून सुटका? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून रस्ते कामांची झाडाझडती

वाई-खंडाळा-महाबळेश्वर पर्यटन पट्ट्यातील रस्त्यांच्या कामांना वेग देण्याचे आदेश; पावसाळ्यापूर्वी दरड प्रतिबंधक उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबई: सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पर्यटन हंगामातील वाढता ताण लक्षात घेऊन येथील अंतर्गत रस्ते, घाटमार्ग आणि पोलादपूर जोडणाऱ्या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामांना तातडीने गती देण्याच्या सूचना त्यांनी मंत्रालयातील बैठकीत दिल्या.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून देशभरात प्रसिद्ध असून वर्षभर येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. विशेषतः वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि पोलादपूर या मार्गांवर पर्यटन हंगामात वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होतो.

अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, घाटमाथ्यावरील तीव्र वळणे, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि वाढत्या वाहतूक दाबामुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवत असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विविध रस्ते प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) शरद राजभोज, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

बैठकीत वाई-महाबळेश्वर-पोलादपूर या महत्त्वाच्या पर्यटन मार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील विविध अंतर्गत रस्ते, घाटमार्ग आणि संपर्क रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. विशेषतः मांढरदेवी-वाई मार्ग तसेच शिंदेवाडी-भोर या महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, महाबळेश्वर आणि परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान होत असल्याने रस्त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ते बांधकाम करताना दीर्घकालीन दर्जेदार कामे होण्याला प्राधान्य द्यावे. घाट परिसरातील रस्ते तीव्र उतार-चढावाचे असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

घाटमार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, संरक्षक कठडे, सूचना फलक आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरड प्रतिबंधक उपाययोजना, पाणी निचरा व्यवस्था आणि रस्त्यांच्या मजबुतीकरणाच्या कामांनाही प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी चांगल्या रस्ते सुविधांची आवश्यकता अधोरेखित करताना मंत्री महोदय म्हणाले की, वाई-खंडाळा-महाबळेश्वर हा परिसर राज्याच्या पर्यटन नकाशावरील महत्त्वाचा भाग आहे.

त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित, वेगवान आणि सुकर प्रवास अनुभव मिळावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. प्रलंबित रस्ते प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी विविध रस्ते प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती सादर केली तसेच कामे गतीने पूर्ण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.