Road
Road Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Karhad : रस्ता सहापदरीकरणाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद; ठेकेदार कंपनीवर संताप

टेंडरनामा ब्युरो

कऱ्हाड (Karhad) : वराडे येथे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या मनमानी कामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा शेतकरी अडचणीत आला आहे. घाईगडबडीत व मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कामामुळे शेतकरी कोंडीत सापडला असून, वराडे येथील शेतकऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाचे काम बंद पाडून चुकीच्या कामाचा निषेध केला.

दरम्यान, कऱ्हाड- उंब्रज मार्गावर वराडेसह, वहागाव परिसरातील सध्या सुरू असणारे शेतकऱ्यांची कायमस्वरूपी गैरसोय करणारे काम त्वरित थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून रविवारी ग्रामस्थांनी वस्तुस्थिती दाखवून सेवा रस्त्याची वाढीव उंची व भूसंपादन यास विरोध असून, त्यात बदल झाला नाही, तर यापुढेही संबंधितांना काम करून देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, तसेच यावेळी उपस्थित संबंधित अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविषयी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

शेंद्रे ते कऱ्हाड दरम्यानच्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्यातच वराडे गावच्या हद्दीत असलेल्या तासवडे टोलनाक्यामुळे येथील ग्रामस्थांना रुंदीकरणाच्या झळा कायमस्वरूपी सोसाव्या लागणार आहेत. टोलनाक्यासाठी वराडे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात आले आहे. भूसंपादनातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाले नाही. शेतजमिनींचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा फटका, कागदपत्रे व अटी शर्तीचे पालन करूनही दमछाक व्हावे लागत आहे. अपेक्षित दरही शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे नाराजीचा सूर आहे. या विरोधात वराडेतील शेतकऱ्यांनी रविवारी एकजूट करत डी. पी. जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांना वराडे येथे घटनास्थळी बोलावून घेतले व वस्तुस्थिती दाखवली. सदरच्या कामामुळे शेतकऱ्यांना ये- जा करणे, तसेच शेतीची इतर कामे करणे मुश्कील होणार आहे. पावसाळ्यात पाण्याची तळी साचून शेकडो हेक्टर शेती नापीक होण्याचा धोका आहे, तसेच वाढीव भूसंपादन केले गेले आहे यासह अन्य तक्रारींचा पाढा वाचला.

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत नका पाहू

कऱ्हाड- उंब्रज मार्गावर वराडे, तासवडे, वहागाव, वनवासमाची, खोडशी आदी परिसरातील सेवा रस्त्यावर व शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुमारे दहा फूट उंचीवर ठिकठिकाणी भराव टाकल्याने संताप परिसरातील सर्व शेतकरी बांधवांत रस्ते कंपनीविषयी संतापाचे वातावरण आहे. संबंधित शेतकऱ्यांनी रस्ते कंपनी व ठेकेदार यांना याबाबत वारंवार गाऱ्हाणी मांडूनही त्यांच्याकडून शेतकऱ्यांना भविष्यात त्रास होईल, अशा मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याने शेतकरी भूसंपादनाला विरोध करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, तसेच संबंधित रस्ते विकास अधिकारी व रस्ते ठेकेदार यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास त्याला रस्ते प्रशासन जबाबदार राहील, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी व्यक्त केली.