Pune Metro
Pune Metro Tendernama
मुंबई

ठाणे 'मेट्रो-४'ची रखडपट्टी; ३८ टक्केच काम पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणेकरांना दिलासादायी 'मेट्रो ४' प्रकल्पाची रखडपट्टी सुरु आहे. २०२२ अखेर पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या या मेट्रोचे आतापर्यंत फक्त ३८ टक्केच काम पूर्ण झाले आहे. या रखडपट्टीमुळे मेट्रो-४ आता २०२६ मध्येच पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे प्रस्तावित साडेचौदा हजार कोटींच्या प्रकल्प खर्चातही भरमसाठ वाढ अटळ आहे.

राज्य सरकारने ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि जलद होणार असल्याने मेट्रो ४ च्या प्रकल्पाला मान्यता दिली. सरकारने २७ सप्टेंबर २०१६ मध्ये मेट्रो-४ च्या प्रस्तावाला मान्यता दिली. तसेच सुमारे १४ हजार ५४९ कोटींचा निधी निर्धारित करण्यात आला. २५ ऑक्टोबर २०१६ ला शासन निर्णय निघाला. मेट्रो-४ च्या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीला २८३ कोटी २१ लाखाचा निधी देण्यात आला. या प्रकल्पासाठी ५४ महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला. त्यानंतर या मेट्रोचा गायमुखपर्यंत विस्तार करण्यात आला. वडाळा येथून मेट्रो-४ च्या प्रकल्पाची सुरुवात होत असून ही मेट्रो मार्गिका ही अमर महल चेंबूर-घाटकोपर-विक्रोळी-मुलूंड-ठाणे-कासारवडवली आणि त्यापुढे गायमुखपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला आहे. या ३५ किमीच्या मेट्रो मार्गावर ३२ स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

मेट्रो-४ चे काम २०२२ अखेर पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र कोविड महामारीमुळे या मेट्रोच्या कामाला ब्रेक लागला. त्यात एका ठेकेदारामुळे सुद्धा काम रखडले. यामुळे मेट्रोच्या कामाचे नियोजन बिघडले. काम रखडल्याने मेट्रोच्या किमतीत वाढ झालीच, त्याशिवाय मेट्रोच्या सल्लागार कंपनीच्या खर्चातही वाढ झाली. ती ३३.९४ टक्के म्हणजेच २८३ कोटी २१ लाखावरून ३७९ कोटी ३२ लाखावर पोहोचली. एकीकडे वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली-गायमुख मेट्रो चार आणि मेट्रो चार-अ या प्रकल्पांसाठी राज्य शासन दुय्यम कर्जाच्या रूपाने आर्थिक उभारणी करत आहे. तर दुसरीकडे रखडपट्टीमुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोविड महामारीनंतर पुन्हा मेट्रोच्या कामांना गती मिळत आहे. मात्र मेट्रो-४च्या मार्गात अद्यापही अनेक अडचणी आहेत. भूसंपादन, ठेकेदार अपयशी झाल्याने नव्याने उप ठेकेदार नेमणे, न्यायालयातील प्रलंबित दावे आदी अडथळ्यांमुळे मेट्रो-४ च्या गतीला खीळ बसली. आतापर्यंत मेट्रो-४ चे सुमारे ३८ टक्के काम पूर्ण झाले आहे. रखडपट्टीमुळे २०२२ ची ही मेट्रो-४ आता २०२६ मध्येच पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.