MSEB
MSEB Tendernama
मुंबई

TENDERNAMA IMPACT: भाजप सत्तेत येताच महामुंबई 'अदानी'ला आंदण!

मारुती कंदले

मुंबई (Mumbai) : राज्यात भाजप (BJP) सरकार सत्तेत येताच नवी मुंबई (Navi Mumbai) 'अदानी'ला (Adani) आंदण देण्याची तयारी सूरू झाल्याचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट 'टेंडरनामा'ने नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्रात महावितरणच्या परिसरात विस्तार करण्याची 'अदानी'ची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. याआधीपासूनच अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) या तिच्या उपकंपन्यांद्वारे वांद्रे ते पश्चिमेकडील मीरा-भाईंदर आणि पूर्वेकडील सायन ते मानखुर्द या मुंबई उपनगरी भागात वीजेचा पुरवठा करत आहे. त्यापाठोपाठ आता 'अदानी' समूह मुंबई (भांडूप, मुलूंड), ठाणे (ठाणे, नवी मुंबई) आणि रायगड (खारघर, तळोजा, पनवेल, उरण) या परिसरातील वीज वितरण हक्क ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्र खासगीकरणाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे जात आहे. या खाजगीकरणाच्या धोरणाला विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर गेले आहेत.

मोफत सिमकार्ड देऊन बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तसेच आज महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रातील सार्वजनिक उद्योग असलेल्या महावितरणला गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला विरोध म्हणून हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. बीएसएनएल बुडण्यापूर्वी जिओ फुकटात आजीवन सिमकार्ड, जास्त स्पीडचा भरपूर डेटा पॅक देत होते, आज कमी स्पीडचा डेटा पॅकला सातशे रुपये मोजावे लागत आहेत. उद्या मोबाईलच्या रिचार्जप्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसूसलेले आहेत. त्यांच्या विरोधातील हा संप आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारा हा सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे याकरिता हे आंदोलन आहे. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी अत्यावश्यक सेवा आहे. उद्या ती खाजगी भांडवलदारांच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला कदापिही परवडणारी नाही, त्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समितीने संपाचे हे हत्यार उपसले आहे. हा संप फक्त ग्राहक हिताकरिता असल्याचा संघटनांचा दावा आहे.

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा घाट
राज्यात भाजप सरकार सत्तेत येताच नवी मुंबई 'अदानी'ला आंदण देण्याची तयारी सुरू आहे. अदानी समूह आता मुंबई (भांडूप, मुलूंड), ठाणे (ठाणे, नवी मुंबई) आणि रायगड (खारघर, तळोजा, पनवेल, उरण) या परिसरातील वीज वितरण हक्क ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. अपेक्षेप्रमाणे, सार्वजनिक आक्षेपांना न जुमानता वीज नियामक आयोग (एमईआरसी) 'अदानी'चा अर्ज मंजूर करण्याची खात्रीशीर माहिती आहे. सध्या या परिसरात महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या महावितरण कंपनीकडून वीज मिळत आहे. 'अदानी'ने यासंदर्भात अलीकडेच (ता.२६ नोव्हेंबर २०२२) एक जाहीर सूचना सुद्धा प्रसिद्ध केली आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई लिमिटेडने (AENML) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) हा अर्ज (केस क्रमांक 173 2022) सादर केला आहे. वीज कायदा, 2003 ("अधिनियम") च्या कलम 14 च्या 6 व्या तरतुदीनुसार एमईआरसी (वितरण परवान्याच्या सामान्य अटी) विनियम, 2006 च्या तरतुदींसह 'अदानी' ला वितरण परवाना मंजूर करण्यासाठीचा हा अर्ज आहे. आयोगाने 25 नोव्हेंबर 2022 रोजी हा अर्ज स्वीकारला आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) या तिच्या उपकंपन्यांद्वारे वांद्रे ते पश्चिमेकडील मीरा-भाईंदर आणि पूर्वेकडील सायन ते मानखुर्द या मुंबई उपनगरी भागात आणि आसपासच्या ग्राहकांना वीजेचा पुरवठा करत आहे. कंपनीचे सध्या ३१ लाख वीज ग्राहक आहेत. कंपनी 2,000 मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करत आहे.

कंपनी मुलूंड, भांडूप, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबईचा समावेश असलेल्या प्रस्तावित परवाना क्षेत्रात वितरण नेटवर्क विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबई, पनवेल, खारघर, तळोजा आणि उरण या प्रस्तावित क्षेत्रासाठी कंपनीने वितरण परवाना मागितला आहे. सध्या हा परिसर महाराष्ट्र राज्य वीज वितरण क्षेत्रात येतो. वितरण परवाना मिळाल्यानंतर प्रस्तावित परवाना क्षेत्रामध्ये वीज पुरवठा विश्वसनीयरित्या पुरवण्यास सक्षम आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

प्रस्तावित क्षेत्रांमध्ये काही नगरपरिषद किंवा महानगरपालिका जसे की बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, पनवेल महापालिका, उरण नगरपरिषद, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे क्षेत्र पूर्ण किंवा अंशतः समाविष्ट आहे. परवाना मिळाल्यापासून 5 वर्षांच्या आत 5 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्याचे कंपनीचे उद्धिष्ट आहे.

महाराष्ट्रात महावितरणच्या परिसरात विस्तार करण्याची 'अदानी'ची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. यानिमित्ताने महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्र खासगीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे जात आहे.

नवी मुंबईचा परिसर हा महावितरणला घसघशीत महसूल देणाऱ्या राज्यातील निवडक परिसरांपैकी एक आहे. शिवाय भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. त्यामुळेच अदानीने महाराष्ट्रात आपला वीज व्यवसाय विस्तारण्यासाठी सर्वप्रथम नवी मुंबईची निवड केली आहे.

'अदानी'ने वितरण परवाना मंजूर करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक सूचना प्रसिद्धीस दिली आहे. त्यावर महिनाभर लोकांकडून सूचना हरकती मागविण्यात आल्या होत्या. मात्र, सार्वजनिक आक्षेपांना न जुमानता वीज नियामक आयोग (एमईआरसी) 'अदानी'चा हा अर्ज मंजूर करण्याची खात्रीशीर माहिती आहे