Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg Tendernama
मुंबई

समृद्धी महामार्गाचा भंडारा-गोंदियापर्यंत विस्तार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये नगरविकास विभागासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, रस्ते बांधकामाला गती देणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. तसेच नागपूर आणि गडचिरोली देखील समृद्धी महामार्गाने जोडले जाणार आहेत. त्यामुळे गडचिरोली ते मुंबई अंतर खूप कमी वेळात कापता येणार आहे. तसेच गोंदियावरून देखील मुंबईला लवकर पोहोचता येईल. त्यासाठी या मार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे.

नागपूर- मुंबईतील अंतर कमी होण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. यासाठी नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे ७२ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

कोणत्या जिल्ह्यातून जातो समृद्धी महामार्ग?
नागपूर ते मुंबईमध्ये ७०० किलोमीटर अंतर असून १५० किमी वेगाने हे अंतर पार करता येणार आहे. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या 12 जिल्ह्यांना जोडणारा आहे. आता हाच महामार्ग भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील या रस्त्यांचा फायदा होणार आहे. यापूर्वी जवळपास 26 तालुके व 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार होता. यामध्ये आता भर पडली आहे.