Mumbai Flyover Tendernama
मुंबई

Mumbai: कुर्ला ते घाटकोपर दरम्यान एलबीएस रोडवर 1,635 कोटींचा नवा उड्डाणपूल

रोजच्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबईतील कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील नित्याच्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने कुर्ला येथील कल्पना टॉकीजपासून ते घाटकोपर (पश्चिम) येथील पंख शाह दर्ग्यापर्यंत ४.५ किलोमीटर लांबीचा एक महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या भव्य प्रकल्पासाठी मुंबई महापालिका १,६३५ कोटी रुपये खर्च करणार असून, नुकत्याच या बांधकामासाठी टेंडर काढण्यात आल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून कुर्ल्यातील कल्पना टॉकीज ते घाटकोपर-अंधेरी मार्ग वाहतुकीसाठी कुप्रसिद्ध आहे. या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांचा आणि वाहनचालकांचा वेळ वाया जात होता. ही समस्या लक्षात घेऊन बीएमसीने दोन वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाची योजना आखली. मात्र, या प्रकल्पाला अपेक्षित गती मिळाली नाही.

या दिरंगाईचे मुख्य कारण म्हणजे, पुलाच्या प्रस्तावित मार्गालगत असलेली सुमारे एक किलोमीटर जमीन भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येते. नौदलाने या जागेजवळ पूल बांधण्यास आक्षेप घेतल्यामुळे प्रकल्पाला नौदलाचे 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळणे अनिवार्य होते. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत एनओसीसाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुलाच्या कामाचे सर्व अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या.

अखेरीस, प्रतीक्षा संपली असून, बीएमसीला नौदलाकडून नुकतेच एनओसी प्राप्त झाले आहे. यामुळे प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला असून, बीएमसीने व्हीजेटीआय मार्फत तातडीने पुलाच्या बांधकामासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे.

राज्यात आणि बीएमसीमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता, प्रशासनाने या महत्त्वाच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ६ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पूल बांधकामासाठी कंत्राटदाराची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

हा उड्डाणपूल ४.५ किलोमीटर लांब आणि १५.५० मीटर रुंद असेल. यामुळे कुर्ला एलबीएस ते घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. उड्डाणपुलाला घाटकोपर-अंधेरी लिंक रोडशी जोडल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल.

नौदलाच्या जमिनीला लागून असलेल्या भागात, नौदलाच्या हालचालींवर वाहनचालकांची नजर पडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या आराखड्यानुसार, या पुलाच्या बाजूला ६ मीटरपेक्षा जास्त उंचीचे उच्च दर्जाचे ध्वनी अडथळे बसवण्यात येणार आहेत.

कंत्राटदाराला कामाचा आदेश मिळाल्यानंतर हा पूल पुढील चार वर्षांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. एकदा हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर, मुंबईच्या पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.