Eknath Shinde Devendra Phadnavis
Eknath Shinde Devendra Phadnavis Tendernama
मुंबई

शिंदे-फडणवीस जोडी येऊनही 'समृद्धी'चे लोकार्पण लांबणीवर?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या (Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाचा १५ ऑगस्टचा मुहूर्त चुकण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि समृद्धी महामार्गाच्या काही पॅकेजेसमधील अपूर्ण काम त्यामुळे हा मुहूर्त सुद्धा लांबणीवर जाऊ शकतो अशी चिन्हे आहेत.

समृद्धी महामार्ग वाहनांसाठी लवकरच खुला होणार असल्याचे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 जुलै रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितले होते. पहिल्या टप्प्यात नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग चालू करण्याचे नियोजन आहे. समृद्धी महामार्ग गेम चेंजर आहे. या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले आहे. ही फडणवीसांची योजना होती. त्यांनी मला जबाबदारी दिली, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. या महामार्गामुळे लोकांची समृद्धी होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीची लगबग सुरु आहे. मात्र, राज्यातील सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि समृद्धी महामार्गाच्या काही पॅकेजेसमधील अपूर्ण काम त्यामुळे आगामी १५ ऑगस्टचा मुहूर्त सुद्धा पुढे ढकलला जाऊ शकतो अशी शक्यता आहे.

नागपूर-मुंबई दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशाने 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्या आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात सांगितले जाते. सरकारकडून हा महामार्ग सुरु करण्यासंबंधी २ ते ३ वेळा तारखाही घोषित करण्यात आल्या.

- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

- मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा प्रकल्प

- सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. सुमारे 812 किमी अंतर लागते. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर हे अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) काम पाहणार आहे.

- समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई

- जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध समृद्धी महामार्गाशी येणार आहे.

- समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.

- महामार्गाची एकूण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही 22.5 मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे.

- प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही.

- महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इत्यादी उभारण्यात येणार आहे.

- जवळपास 50 पेक्षा जास्त उड्डाणपुल, 24 हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच 5 बोगदे प्रस्तावित आहेत.

- हा महामार्ग खाजगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे

- युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ती दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.

- समृद्धी महामार्ग हा रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे काम करणार आहे. तब्बल 25 लाख रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा दावा आहे.

- या प्रकल्पासाठी तब्बल ६० हजार कोटीहून अधिकचा खर्च येणार आहे.