BMC
BMC Tendernama
मुंबई

'बीएमसी'ला आवडे सौंदर्यीकरण; आकस्मिक निधीतून ९०० कोटींची उधळण

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरणाची कामे सुरु आहेत. त्यासाठी महापालिका तब्बल १७०५ कोटी खर्च करणार आहे. पुढील ३ महिन्यांसाठी त्यापैकी ९०० कोटी रुपये महापालिकेच्या आकस्मिक निधीतून खर्च केला जाणार आहे. मात्र, आकस्मिक निधी हा अत्यावश्यक कामांसाठी वापरणे गरजेचे असताना महापालिका आकस्मिक निधीतून हा खर्च कसाकाय करु शकते असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. महापालिकेत सध्या लूट सुरु आहे. कामकाजात पारदर्शकपणा राहिलेला नाही अशी टीकाही करण्यात येत आहे.

मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून त्याचे सौंदर्यीकरण, सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सौंदर्यीकरण, सुशोभीकरणाची कामे लवकर पूर्ण करा असे, निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ५० टक्के कामे डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत तर, मार्च २०२३ अखेरपर्यंत सर्व कामे मार्गी लावा असे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईच्या सौंदर्यीकरणावर एकूण १७०५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी पुढील ३ महिन्याकरिता ९०० कोटी रुपये देण्याला प्रशासक असलेल्या आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पातील आकस्मिक निधीमधून हा खर्च केला जाणार आहे. आकस्मिक निधी हा अत्यावश्यक कामांसाठी वापरणे गरजेचे आहे. त्यामधून सौंदर्यीकरण कसे करू शकतात. सौंदर्यीकरण महापालिकेच्या इतर निधीतून करता येऊ शकते. मात्र सध्या महापालिकेची मनमानी सुरु आहे. करदात्यांचे पैसे कुठे खर्च केले जात आहेत याची माहिती मिळणे गरजेचे आहे. महापालिकेत लूट सुरु आहे. कामकाजात पारदर्शकपणा राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली.

तर मुंबई सुंदर होत आहे, हे चांगले आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी महापालिका काम करत आहे तर ते चांगले आहे. पण त्याच बरोबर हे काम चांगले होईल याची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून त्याचे सौंदर्यीकरण, सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे हाती घेतली आहेत. रस्त्यांचे पुनर्पृष्‍टीकरण, झेब्रा क्रॉसिंग, रस्ते दुभाजकांमधील मोकळ्या जागेत सुशोभित फुलझाडांची हिरवळीची लागवड, १५ किलोमीटर लांबीच्या फुटपाथवर स्टॅम्प काँक्रिट, आकर्षक विद्युत दिवे, अतिरिक्त जागेत शोभिवंत कुंड्या, पदपथांवर जिथे शक्य आहे तिथे नाविन्यपूर्ण, कलापूर्ण व परिसर सौंदर्य वाढविणारी आसने लावणे, पथदिव्यांचे सुशोभीकरण, विद्युत खांबांना प्रकाश योजना, अनधिकृत केबल, लटकलेल्या तारा काढून टाकणे आदी कामे केली जणार आहेत. तसेच मुंबई महानगराला इतिहासाचा वारसा असून महानगरात असलेल्या किल्ल्यांवर विद्युत रोषणाई करण्यात यावी, त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळेल. तसेच भारताचे प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात यावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.