Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

BMC : तरंगता कचरा काढण्यासह अन्य उपाययोजनांसाठी लवकरच टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरात दरवर्षी नालेसफाईच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असले, तरी नाल्या शेजारी राहणारे रहिवाशी नाल्यात थर्माकोल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॕपर्स टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाल्यात कचरा जाऊ नये यासाठी छोट्या नाल्याजवळ जाळ्या लावणे किंवा नाले बंदीस्त करणे, मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी तरंगता कचरा काढण्यासह अन्य उपाय करण्यासाठी लवकरच टेंडर काढण्याचे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले आहेत.

तसेच आगामी वर्षभरात नाल्यातून नियमित गाळ आणि कचरा बाहेर काढले जाईल, याची कंत्राटदार नेमून जबाबदारी सुनिश्चित करण्याचे निर्देश पी. वेलरासू यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी पी. वेलरासू यांनी केली. मुंबईतील शहर भागात दादर, धारावी पूर्व उपनगरात ए. टी. आय. नाला, व्ही. एन. पुरव मार्ग (चेंबूर), माहूल नाला, वसंतदादा पाटील महाविद्यालय (प्रियदर्शनी), रफी नगर नाला (गोवंडी), पीएमजीपी नाला, घाटकोपर मानखुर्द जोड रस्ता, मानखुर्द नाला, लक्ष्मीबाग नाला, पूर्व द्रुतगती महामार्ग (घाटकोपर), जॉली बोर्ड नाला, ९० फीट रोड (कांजूरमार्ग), बाऊंड्री नाला (मुलुंड) या भागातील कामांची पाहणी केली. यावेळी उपआयुक्त (पायाभूत सुविधा उल्हास महाले, प्रमुख अभियंता (प्रभारी) (पर्जन्य जलवाहिन्या) प्रकाश सावर्डेकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम वेगाने सुरू आहे; मात्र नाल्याशेजारी राहणारे लोक नाल्यात पुन्हा कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. नालेसफाईच्या काम जोरात सुरू असून, तळापर्यंत दगड लागतो इथपर्यंत गाळ उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यावर कचरा तरंगत असला तरी कचऱ्याखालून पाण्याचा प्रवाह सुरू असतो. तरी लोकांनी गाळ उपसा केल्यानंतर पुन्हा नाल्यात कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे उपायुक्त पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले. नाल्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी नाल्यात कोणताही कचरा न टाकता पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाला सहकार्य करावे , असे आवाहन उपआयुक्त उल्हास महाले यांनी केले. भरतीच्या काळात नाल्यातून तरंगणारा कचरा आणि गाळ काढण्याच्या कामात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी तुंबण्याची गैरसोय टाळण्यासाठी कचरा नाल्यात न टाकता सहकार्य करावे, असे आवाहन महाले यांनी केले.