मुंबई (Mumbai) : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी मुंबई महापालिकेने २२ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे कांदिवली, बोरिवली व दहिसर येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रहिवाशांना स्वच्छ व भरपूर पाणी मिळणार आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा, गढूळ पाणीपुरवठा या तक्रारी आता दूर होणार आहेत. जुन्या जलवाहिन्या बदलून ४५० ते ९०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी मुंबई महापालिका तब्बल २२ कोटी रुपये खर्चणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा, गढूळ पाणी अशा तक्रारी येत असतात. मुंबईकरांना समान पाणीवाटपाची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी, यासाठी जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. पश्चिम उपनगरातील कांदिवली, बोरिवली व दहिसर भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ८० ते ३०० मि.मी. व्यासाच्या व काही भागात ४५० व ९०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या जलविभागाने टेंडर प्रसिद्ध केले आहे. या कामावर २२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या जलविभागातील उच्चपदस्थांनी दिली.