Gulabrao Patil
Gulabrao Patil Tendernama
मुंबई

Big News : जलजीवनच्या कामात दिरंगाई करणारे कंत्राटदार ब्लॅक लिस्ट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) योजनेची रायगड जिल्ह्यात विविध कामे सुरू आहेत. या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या आणि मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री पाटील म्हणाले की, रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत 1430 योजना मंजूर आहेत. एकूण 1259 कोटी रुपयांची ही कामे आहेत. नुकतेच यातील बहुतांशी कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तसेच कामांची संख्या जास्त आणि कंत्राटदार संख्या कमी अशी स्थिती असल्याने एकाच कंत्राटदाराला अनेक कामे दिल्याचे रायगडसह इतर जिल्ह्यांतही दिसते. मात्र कार्यारंभ आदेश असूनही कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.

नेमके प्रकरण काय आहे??
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने तब्बल ९१३ कोटी ३८ लाखांच्या १४०५ जलजीवन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या अभियानाला टेंडर प्रक्रियेपासूनच ग्रहण लागले आहे. सुधागड तालुक्यातील ९३ कामांपैकी ५७ कामे एकाच ठेकेदाराला मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर एकेका ठेकेदाराला सुमारे १०० कोटींची कामे मिळाल्‍याने ती दर्जेदार आणि वेळेवर कशी पूर्ण होणार, असा सवाल केला जात आहे.

जिल्हा परिषदेने जलजीवनच्या कामांची टेंडर प्रक्रिया राबवताना निकोप स्पर्धा होण्यासाठी ९१९ नोंदणीकृत कंत्राटदारांना सहभागी करून घेतले होते. दुसऱ्या जिल्ह्यातील ठेकेदारांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी वृत्तपत्रात प्रसिद्धी न देता बेवसाईटद्वारे व्यापक प्रसिद्धी दिल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे. मात्र, या प्रक्रियेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दुसऱ्या जिल्ह्यातील ठेकेदार सहभागी झाले. १४०५ इतक्या योजना ठेकेदारांना मंजूर झाल्या. एकेका ठेकेदाराला ५० च्यावर म्हणजेच सुमारे १०० कोटींची कामे देण्यात आल्‍याची माहिती पुढे आली आहे. ठेकेदार इतक्या योजना दीड वर्षात पूर्ण करताना, कामाचा दर्जा कसा राखणार, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठेकेदारांनी आपली कामे दुसऱ्या ठेकेदारांना सबटेंडर केल्याचीही चर्चा आहे.

सुधागड तालुक्यातील ९३ कामांपैकी ५७ कामे एकाच ठेकेदाराला मंजूर झाली आहेत. तर अलिबाग तालुक्यात सासवणे गावात २०२१ मध्ये एक व २०२३ मध्ये एक अशा दोन योजनांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. काही ठेकेदारास ५० च्या वर कामे दिली जात असून, त्यामुळे कामाचा दर्जा खालावणे व कामे वेळेत पूर्ण न होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दोन वर्षांपूर्वी कार्यारंभ आदेश दिलेल्या ठिकाणी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. या कामात अनियमितता दिसून येत असल्याने कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठेकेदारांची संख्या ठराविक व कामांची संख्या अधिक यामुळे एकेका ठेकेदाराला २० पेक्षा जास्‍त कामे मिळाली आहेत. या ठेकेदारांच्या बीड क्षमतेपेक्षाही अधिक कामे दिली गेली असून बऱ्याच जणांनी खोटी कागदपत्रेही सादर केल्याच्या चर्चा आहेत. मात्र, वरिष्ठ पातळीवरून दबाव असल्याचे कारण सांगत तांत्रिक बाबींना फाटा देत प्रशासकीय मान्यता देणे, टेंडरप्रक्रिया राबवणे व कार्यारंभ आदेश देण्यालाच प्राधान्य दिल्याचे दिसते.

सर्वाधिक कामे मिळवणारे ठेकेदार
जी.डी. मोहिते कन्स्ट्रक्शन - ५७ कामे,
अरविंद धोंडू पाशिलकर - ५५ कामे,
डी. के. कन्स्ट्रक्शन - ३६ कामे,
विवेक रोहिदास पाटील -२१ कामे
राज एंटरप्राइजेस, विजय साळुंखे - २० कामे