मुंबई (Mumbai): महापारेषण कंपनीने सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात नफा अंदाजे १८०० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे मापदंड पूर्ण करत चांगली कामगिरी केलेली आहे. यात सातत्य राखून आगामी वर्षातही यापेक्षा अधिक सरस कामगिरी महापारेषणकडून होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत फडणवीस बोलत होते. केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभरपैकी ९३ गुण मिळवून महावितरणने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल फडणवीस यांनी महावितरणच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. तसेच मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांकडून निकष बदलण्याची मागणी होत आहे. ऊर्जा विभागाने समस्या लक्षात घेवून मार्गदर्शक सूचना काढाव्यात. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीने काम करताना महावितरण, महापारेषण व महानिर्मिती यांच्याशी संवाद वाढवून कामे गतीने करावीत. महापारेषण कंपनीने सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात नफा अंदाजे १८०० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.
महापारेषण कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे मापदंड पूर्ण करत चांगली कामगिरी केलेली आहे. यामध्ये सातत्य राखून आगामी वर्षातही यापेक्षा अधिक सरस कामगिरी महापारेषणकडून होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होत्या. यावेळी उर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक आशिष चंदाराणा, निता केळकर, संचालक (वित्त) अनुदिप दिघे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.