Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit Pawar Tendernama
मुंबई

चौकशी होऊनच जावू द्या..! अजित पवारांनी का दिले फडणवीसांना आव्हान?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वेदांत - फॉक्सकॉन (Vedanta - Foxconn) समूहाचा प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेल्यावरून राज्यात पेटलेला राजकीय वाद शिगेला पोचला. आजही या प्रकल्पावरून शिंदे - फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लघु उद्योगाच्या कार्यक्रमात गुजरात काय पाकिस्तानमध्ये आहे काय? असा सवाल केला होता. त्याला शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार टोला लगावत ‘मग महाराष्ट्र पाकिस्तान मध्ये आहे काय?’ असा सवाल केल्याने भाजप (BJP) नेते आक्रमक झाले.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट टक्केवारी किती मागितली? असा सवाल करत शिवसेनेवर प्रहार केला. तर, वेदांत गुजरातला का गेला याची चौकशी होऊनच जावू द्या, मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा उलटवार विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही आज पहिल्यांदाच या वादावर भाष्य करत गुजरात लहान भाऊ आहेच तरीही वेदांतचा प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला? असा सवाल भाजपला केला.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Savant) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर आक्षेप घेत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वलच होता तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर होता, असे नमूद केले. याबाबतची केंद्र सरकारची आकडेवारी सादर करत पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र फडणवीस पुन्हा कसा पहिल्या क्रमांकावर आणणार असा टोलाही लगावला आहे.

अशीही आकडेवारी
सचिन सावंत यांनी केंद्र सरकारच्या आकडेवारीचा हवाला दिला. यामध्ये ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ दरम्यान थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते असे दिसून येते. महाराष्ट्रात या काळात तीन लाख २९ हजार २९१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकने दोन लाख ७२ हजार ९०८ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आणली. याच काळात गुजरातमध्ये मात्र केवळ दोन लाख २६ हजार ६५८ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक होऊन गुजरात तिसऱ्या क्रमांकाचे राज्य होते त्या पाठोपाठ चौथ्या क्रमांकावरील दिल्लीत एक लाख ४७ हजार ९६१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, अशी आकडेवारी सादर करत सावंत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले.