Kharkopar - Uran Line
Kharkopar - Uran Line Tendernama
मुंबई

'हा' आहे खारकोपर-उरण लोकलचा नवा मुहूर्त? खर्चात १,२५० कोटींची वाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारकोपर ते उरण (Kharkopar To Uran Railway Rout) दरम्यानच्या 1 हजार 768 कोटींच्या प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन तो आता 2 हजार 980 कोटींवर पोहोचला आहे. सध्या या रखडलेल्या रेल्वे मार्गातील कामाला वेग आला आहे. त्यामुळे डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबईच्याच विकासाचा एक भाग असलेल्या उरणला इतर शहरांशी जोडण्यासाठी नवी मुंबईतील नेरूळ ते उरण या 26.7 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाला 1997 ला मंजूरी देण्यात आली. यातील नेरूळ ते खारकोपर हा 12.4 किलोमीटरचा मार्ग कार्यान्वित झाला आहे. तर खारकोपर ते उरण या 14.3 किलोमीटरच्या मार्गाचे काम भूसंपादन व वन विभागाच्या परवानगीमुळे रखडले होते. ते काम सुरू झाले आहे. या मार्गावर गव्हाण, जासई, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी व उरण या सहा स्थानकांच्या उभारणीचे काम सुरू आहे.

या मार्गावरील रेल्वे मार्ग व स्थानकांची कामे वेगात सुरू आहेत. रांजणपाडा स्थानकावर छप्पर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या मार्गावरील रेल्वे स्थानक, मार्गाचे विद्युतीकरण यांची कामे सुरू आहेत. हा प्रकल्प रेल्वे व सिडको यांच्या भागीदारीतून उभारण्यात येत आहे. मार्गाचा अपेक्षित खर्च काम रखडल्याने वाढला आहे. सुरुवातीला 1 हजार 768 कोटींचा असलेल्या खर्चात वाढ होऊन तो 2 हजार 980 कोटींवर पोहोचला आहे. या भागीदारीच्या प्रकल्पाच्या उभारणीत निधीच्या कमतरतेमुळे सुद्धा काम लांबणीवर पडले होते. खारकोपर ते उरणपर्यंतचे काम सप्टेंबर महिन्यात पूर्ण करण्याचा निर्धार रेल्वे आणि सिडकोने केला होता, मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही. मात्र सध्या या कामाने वेग धरला आहे. हे काम डिसेंबर 2022 किंवा जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

उरण हे ओएनजीसी, जेएनपीए बंदर, भारत पेट्रोलियम, वायू विद्युत केंद्र व बंदरावर आधारित उद्योग यामुळे राज्यातील मुख्य औद्योगिक केंद्र बनले आहे. त्याच प्रमाणे बंदरावर आधारित सेझ सह अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. तर दुसरीकडे सिडकोच्या माध्यमातून नागरीकरणही वेगाने सुरू असल्याने या परिसराला रेल्वे मार्गाची आवश्यकता आहे. त्यामुळे उरणला जोडणारा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास उरणच्या विकासाला वेग येणार आहे.