Thane - Boriwali Tunnel
Thane - Boriwali Tunnel Tendernama
मुंबई

Good News! बोरिवलीतून ठाणे अवघ्या 15 मिनिटांत; 7 हजार कोटींतून...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या बोरिवली - ठाणे (Boriwali - Thane Tunnel) या भुयारी मार्ग प्रकल्पाचे टेंडर येत्या दोन महिन्यांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) प्रसिद्ध केले जाणार आहे. सुमारे सात हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर अपेक्षित आहे. पाच वर्षांत या बोगद्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ११.८ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग देशातील सर्वांत लांब भुयारी मार्ग ठरणार आहे. तसेच या भुयारी मार्गामुळे बोरिवली ते ठाणे अंतर सुमारे १२ किलोमीटरने घटणार आहे. त्यामुळे बोरिवली-ठाणे हा दीड तासाचा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे.

सध्या ठाण्याला जाण्यासाठी बोरिवलीवासियांना घोडबंदर रोडचा आधार आहे. मात्र गुजरात आणि दिल्लीकडून येणारी अवजड वाहने याच रस्त्याने पुढे ठाणे आणि जेएनपीटीकडे जातात. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परिणामी येथे बाराही महिने कोंडी होते. बोरीवली ते ठाणे या अंतरासाठी मुंबईकरांना दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना कायमच त्रासाला सामोरे जावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएकडून संजय गांधी उद्यानाच्या खालून ११.८ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. यापूर्वी एमएमआरडीए दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन बोगदे बांधणार होते. मात्र त्यात बदल करण्यात आला असून आता प्रत्येकी दोन मार्गिकांचे दोन बोगदे तयार केले जाणार आहेत. यासाठी सुमारे सात हजार कोटी खर्च येणार आहे. यातील भुयारी मार्ग १०.२५ किमी लांबीचा असेल. तर १.५ किमी अंतर जमिनीवर असेल. हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे.

सध्या बोरिवली ते ठाणे प्रवासासाठी फाऊंटन येथून घोडबंदर रस्त्यावरून वळसा घालून जावे लागते. ठाणे-बोरिवली हे अंतर सुमारे २५ किलोमीटर पडते. मात्र या भुयारी मार्गामुळे बोरिवली ते ठाणे अंतर सुमारे १२ किलोमीटरने घटणार आहे. प्रवासाचा वेळ एक तासाने वाचणार आहे. तसेच हजारो वाहनांच्या लाखो लिटर इंधनात बचत होईल आणि पर्यावरण संवर्धनालादेखील मदत होणार आहे.

यासंदर्भात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले, या प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी येत्या दोन महिन्यांत टेंडर काढले जाणार आहे. कंत्राटदाराच्या नियुक्तीनंतर पाच वर्षांत या बोगद्याचे काम पूर्ण होईल.