Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
मुंबई

CM: मुंबईच्या विकासाची रखडपट्टी संपली, असे का म्हणाले मुख्यमंत्री?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठराविक लोकांच्या अट्टाहासामुळे मुंबईतील रखडलेल्या मेट्रोच्या (Mumbai Metro) कामाला आता गती मिळाली आहे. आडमुठ्या आणि अहंकारी धोरणामुळे विकासाचे विमान मुंबईच्या धावपट्टीवर रुतून बसले होते. या विमानाने टेकऑफ घेतला असून हीच त्यांची पोटदुखी आहे. आमचे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार आहे. आम्ही धडाकेबाज निर्णय घेत असल्याने यांच्या छातीत धडकी भरली असून, पायाखालची वाळू सरकली आहे. कुणाची खासगी मालमत्ता किंवा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून सरकार चालवत नाही, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाव न घेता लगावला.

गेल्या अडीच वर्षांत मुंबईचा विकास झाला नाही. निवडणूक आली की सातत्याने मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी आवई उठविण्यात येते. ही एकच टोपी मुंबईकरांना किती वेळा घालणार, मुंबईकर आता टोपी घालणार नाही. तो सूज्ञ असून तुम्हाला निवडणुकीत त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे सांगताना शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची यंत्रणेमार्फत योग्य ती चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. ही चौकशी आकसापोटी किंवा सूड भावनेने केली जाणार नाही. ज्यांनी चूक केली त्यांना जबाबदार धरून त्यांची चौकशी केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत विरोधी पक्षाच्यावतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर दोन दिवस झालेल्या वादळी चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारवरील आरोपांचा समाचार घेतला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधकांनी शिंदे सरकारवर जबरदस्त हल्ला केला होता. तो हल्ला परतून लावताना शिंदे यांनी आघाडी सरकारच्या काळात गृह खात्यात बाजार मांडण्यात आला होता, असा आरोप केला. ही बाब आपण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणली होती. हा बाजार उघड्या डोळ्यांनी पाहू नका नाहीतर सरकारवर बालंट येईल, असा इशारा आपण दिला होता. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही, असे शिंदे यांनी विरोधी पक्षाला बजावले.

आम्हाला तुम्ही मिंधे म्हटले तरी चालेल, पण सत्तेसाठी, खुर्चीसाठी मिंधेपणा कोणी केला ते महाराष्ट्राने पहिले आहे. आम्ही कुणाच्या आजारपणाचा फायदा घेतला हे साफ झूठ आहे. आम्ही जे केले ते योग्यवेळी आणि छातीठोकपणे, उघडपणे केले. फोनवर बोलत बोलत मी मोहिमेवर गेलो. ज्यांनी  हिंदुत्वाशी बेईमानी केली त्यांच्या विरोधात आम्ही गेलो. त्यामुळे तुम्ही आम्हाला  अडविण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला कात्रजचा घाट दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.     

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात २०१७ साली मुंबई महापालिकेत आणि २०१२ मध्ये ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काय झाले, याची माहिती दिली. २०१७ साली मुंबईत शिवसेनेचा महापौर हा केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केल्यामुळेच होऊ शकला. याचा मीच साक्षीदार आहे. कारण मीच देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मात्र २०१९ साली त्याची परतफेड कशी झाली हे आपण पाहिले. ठाणे महापालिकेतही २०१२ मध्ये शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मदत केली होती. नाशिकमध्ये त्याची परतफेड कशी झाली आणि त्यांचे सहा नगरसेवक कसे फोडले हे आपण पाहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना आपल्या वाऱ्यालाही उभे केले नाही त्यांच्यासोबतच आज सत्तेसाठी तडजोडी केल्या आहेत. या तडजोडी त्यांनाच लखलाभ होवो, असा टोला शिंदे यांनी लगावला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले. राहुल गांधी यांनी सावरकरांचा सातत्याने अपमान केला. सावरकर हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे दैवत आहे. राहुल गांधी यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावे. त्यांना एक तास घाण्याला जुंपले तर त्यांना यातना समजतील. त्यामुळे त्यांचा निषेध करायचा तेवढा थोडाच आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अपमान केला आहे. त्याबद्दल न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली आहे. आजही ते त्याच पद्धतीने बोलत असतील तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही, आणि राहुल गांधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, असे शिंदे म्हणाले.

शिंदे यांची टोलेबाजी
- निवडणूक आयोगाला चुना म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. यांनी स्वतःच्या पक्षातील लोकांना चुना लावला आता यांची तोंडं चुना लावल्यासारखी झाली आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला गेले त्यावर चपात्या लाटायला गेले, अशी टीका झाली. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी गेले ते काय चपात्या खायला गेले होते?
- तुम्ही गृहमंत्री अमित शहा यांना व्हिलन ठरवता, मोगॅम्बो म्हणता. पण आज बाळासाहेब असते तर त्यांना मिस्टर इंडिया म्हटले असते.
- मी आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून राहणार आहे. श्रीमंतांच्या यादीत माझे नाव येणार नाही ,पण माणुसकीच्या यादीत नाव येईल.