मुंबई

Eknath Shinde : विकासकामांतून मुंबईचा चेहरामोहरा बदलणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपदी असताना मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली. मात्र, मधल्या अडीच वर्षांच्या काळात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे दोन्ही प्रकल्प थांबविण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विकासकामांच्या माध्यमातून मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सुशोभीकरण प्रकल्पांतील ३२० कामांचा तसेच मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण करण्याच्या कामातील ५२ किलोमीटर लांबीच्या १११ कामांचा प्रारंभ तसेच मलनि:सारण वाहिन्या टाकण्याच्या कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा रविवारी चेंबूर येथे पार पडला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर असून मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वांत मोठी महापालिका आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय असलेले हे शहर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्याचा आमचा निर्धार आहे. मुंबई शहर सुंदर, स्वच्छ आणि सुशोभित होत असल्याचा आनंद होत आहे. मुंबईची दरवर्षी तुंबई होत असल्याचे चित्र आम्हाला बदलायचे आहे. येत्या २ वर्षांत मुंबईतील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करण्यात येणार असून त्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मुंबईत सुरू असलेली ही विकासकामे पाहिली असती तर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आमचा नक्कीच अभिमान वाटला असता. राज्याच्या विकासासाठी निधी आणायला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीला जातो. राज्यासाठी हवे ते मागून घेऊन येतो. तुम्ही चांगले संबंध ठेवून मागणी केलीत, तर तुम्हाला मदत मिळते. घरात बसून काही होत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याद्वारे मुंबईकरांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत. याशिवाय एसआरए, म्हाडा, पोलीस वसाहती, बीडीडी वसाहती यातील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे, त्यासाठी गरज लागल्यास कायद्यात बदल करण्याची देखील आमची तयारी असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

दरम्यान, पावसाळ्यात चार महिने रस्त्यावरच्या खड्ड्यांची चर्चा असते. ज्या महापालिकेकडे एवढा पैसा आहे. त्यांचे रस्ते चांगले नाहीत. २५ वर्षांत दरवर्षी रस्त्याचे कामे सुरू होती. मुंबई महापालिकेचे पैसे बँकेत ठेवण्यात आले आहेत. त्याला ३ ते ४ टक्के व्याज मिळते. पैसा केवळ मलईदार कामांसाठी वापरण्यात आला. आता दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल. ४० वर्षे कोणताही खड्डा पडणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे, खासदार पूनम महाजन, आमदार प्रसाद लाड, राजहंस सिह, मंगेश कुडाळकर, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासु आदी उपस्थित होते.