मुंबई (Mumbai) : 'कॅगच्या चौकशीतून सर्व सत्य समोर येईल. कुठलीही चौकशी आकसातून, सूडबुद्धीने होणार नाही', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या कोविड केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे 12 हजार कोटी रुपये खर्चाच्या 76 कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरून महापालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती 'कॅग'ने मान्य केली. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
बिर्ला हाऊसमध्ये भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147वी जयंती साजरी करण्यात आली. वल्लभभाई पटेल यांच्या 147वी जयंतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या कॅगच्या चौकशीबाबत भाष्य केले. "कुठलीही चौकशी सुडबुद्धीने, आकसापोटी, राजकीय हेतूने केली जाणार नाही. त्यामध्ये पारदर्शकता असेल, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जो अहवाल येईल, त्यानंतर बोलू", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
कोरोनाकाळात मुंबई पालिकेने शहरात उभारलेल्या कोरोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यावर या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहांत केली होती. रस्त्यांची कामे, सफाई कामगारांच्या घरांसाठी असलेल्या आश्रय योजना, भेंडी बाजार पुनर्विकासात रस्त्याची रुंदी कमी करून विकासकाचा झालेला फायदा, मुंबई पालिकेतील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वत:च कंपन्या सुरू करून महापालिकेची कामे लाटल्याचा आरोप, या सर्वाची कालबद्ध चौकशी केली जाईल. तसेच काही प्रकरणे फारच गंभीर असल्याने त्यांचे महालेखापरीक्षक व नियंत्रकाकडून (कॅग) विशेष लेखापरीक्षण करण्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले गेले होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या चौकशीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज्यातील सत्ताधारी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याचे संकेत आहेत.