Chandrakant Patil Tendernama
मुंबई

'अजित पवारांसह सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई : राज्यात २००३ पासून विक्री झालेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. केवळ जरंडेश्वरची कारखान्याची चौकशी करा आणि उरलेल्या ६४ कारखान्यांची करू नका अशी आमची भूमिका नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विक्री झालेल्या ६५ सहकारी साखर कारखान्यांची यादी जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे आहे. त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी करत आहे. ऊर्वरित साखर कारखान्यांचे प्रकरणही मनी लाँडरिंगचे असेल तर त्याचीही चौकशी करावी.

उपलब्ध माहितीनुसार इतर कारखान्यांची विक्री कमी किंमतीला झाल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करताना त्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या गैरव्यवहाराला मौन संमती देणाऱ्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची आणि मदत करणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.