Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
मुंबई

मोदींच्या 'या' योजनेतून राज्यात 5 लाख घरे 100 दिवसात बांधणार:शिंदे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून, आता ‘अमृत महाआवास योजना’ 2022-23 अभियानातील 5 लाख घरे पुढील 100 दिवसात बांधण्यात येणार आहेत. विक्रमी वेळेत घरकुले बांधली जाणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’  चा राज्यस्तरीय शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री  गिरीष महाजन, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे आदी उपस्थित होते. सर्वांना घरे मिळावी यासाठी राज्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. यासाठी सर्वसामान्य लोकांना समोर ठेवून लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दर्जेदार आणि वेळेत घरे देण्यासाठी प्रयत्नशील रहावे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात, तेव्हा राज्याचा विकास वेगाने होत असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये ग्रामीण विकास यंत्रणेने अतिशय चांगले काम केले आहे. अमृत महाआवास योजनेत मार्च 2023 पर्यंत 5 लाख घरकुले बांधण्यात येतील. बेघर आणि गरजू लोकांच्या व्यतिरिक्त जे नागरिक महाआवास योजनेच्या निकषात बसत नाहीत, अशा नागरिकांना निकषात बसण्यासाठी नवीन योजना तयार करून ‘बेघरमुक्त महाराष्ट्र’ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उत्तर प्रदेशात 110 दिवसात घरे बांधली जात असून राज्याने 100 दिवसात घरकुले बांधण्याचे ध्येय ठेवले आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि गतिमान घरे बांधली जाणार आहेत. यासाठी ग्रामसेवक, सरपंच यांच्यापर्यंत आढावा घेण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.