Ambarnath Municipal Council
Ambarnath Municipal Council Tendernama
मुंबई

Ambarnath : अंबरनाथ नगरपालिकेत टेंडर प्रक्रियेवरून प्रशासन धारेवर; लोकप्रतिनिधींचा संताप

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात टेंडर (Tender) प्रक्रियेवरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले आहेत. नुकतेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बैठकीत एका माजी नगरसेवकाने नगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष करताना 'टेंडरवरून आता हत्या होणेच बाकी राहिले आहे' असा संताप व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.

स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शहरातील प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी नगरपालिका कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शहरातील कचऱ्याची समस्या आणि पथदिव्यांवरील विजेची समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही चर्चा सुरू असतानाच सध्या अंबरनाथ नगरपालिकेने काढलेल्या टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने त्यावर नगरपालिका प्रशासनाने तोडगा काढावा अशी मागणी अनेक नगरसेवकांनी केली.

लहान कामांसाठी काढण्यात आलेल्या टेंडरचे दर कोटेशन बेसवर असल्यामुळे वार्षिक मंजूर दरापेक्षा कमीच दराने ते काम करण्यावर प्रशासन ठाम राहिल्याने माजी नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात जुंपली आहे. मंजूर वार्षिक दर हे जुने असल्याने ते दर मान्य नसल्याचे माजी नगरसेवकांनी प्रशासनाला सांगितले. हा वाद सुरू असतानाच माजी नगरसेवक रवींद्र करंजुले यांनी टेंडर प्रक्रियेवरून आता केवळ हत्या होण्याचे बाकी राहिले आहे असे म्हणत संताप व्यक्त केला.

यावेळी आमदार किणीकर यांनी यात हस्तक्षेप करत अशी परिस्थिती अंबरनाथ नगरपालिकेत निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शहरात कचऱ्याची समस्या बिकट असून नगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात बिलावरून वाद असेल तर नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला ढोल ताशाच्या गजरात आमंत्रित करून त्याचे सर्व बिल द्यावे. मात्र शहरातील कचरा स्वच्छ करावा, अशी मागणी आमदार किणीकर यांनी यावेळी केली.

शहरात मोठे प्रोजेक्ट होत असताना लहान कामाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे याबाबत नगरपालिका अधिकाऱ्यांचे लक्ष द्यावे आणि लहान समस्या सोडवण्यावर भर द्यावा असेही किणीकर म्हणाले.