Indian Flag
Indian Flag Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद जिल्ह्यातील पुरवठादार गुजराती व्यापाऱ्यांवर का संतापले?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amritmohatsav) धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा' हे अभियान हाती घेतले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात घरोघरी, शाळा, ग्रामपंचायती, तसेच सर्व शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकावला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान औरंगाबाद जिल्हा परिषदेने ध्वज पुरवठ्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात टेंडर काढले. यात सहा ठेकेदारांनी सहभाग नोंदवला. मात्र झेंड्याचा पाच लाखांवर गेलेला आकडा आणि कमी कालावधी पाहून काही पुरवठाधारकांनी माघार घेतली. त्यावर सीईओ डाॅ. निलेश गटणे यांनी पैठणच्या अंकित काॅटन प्रा. लि.चे मनोहर अग्रवाल यांना गळ घातली. त्यांनी विडा उचलला, पाच दिवसात साडेतीन लाख झेंडे वितरित केले. पण कामात मोठी गडबड झाली. (Har Ghar Tiranga)

यासंदर्भात सर्वप्रथम औरंगाबाद तालुक्यातील तिसगाव ग्रामपंचायतीत पुरवठादाराने चक्क तिरंगा ध्वजसंहिता गुंडाळून ठेवत, झेंडे पुरवठा केल्याचे वृत्त 'टेंडरनामा'ने प्रकाशित करताच जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. निलेश गटने यांच्या आदेशाने ध्वजसंहितेचे पालन न करणारे झेंडे परत घेत मनोहर अग्रवाल यांनी गुरुवारी तिसगाव ग्रामपंचायतीला तिरंगा ध्वजसंहिता पाळनारे तीन हजार तिरंगा झेंडे तातडीने वितरित केले.

तिसगाव ग्रामपंचायतीसह औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, कन्नड, गंगापूर आदी तालुक्यात सर्व शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालय, घरोघरी, ग्रामपंचायत आदी ठिकाणी झेंडे वितरित करण्याचा ठेका पैठणच्या अंकित काॅटन प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला होता.

मात्र संपूर्ण जिल्ह्यात पाच दिवसांत पाच लाख झेंडे वितरित करण्यासाठी अंकित काॅटन प्रा. लि.चे अग्रवाल यांची धादल उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असलेल्या गुजरातमधील सुरत येथील एका व्यापाऱ्याने कापड देताना त्यांची कोट्यवधींची फसवणूक केली. त्यात जिल्हाभरातील मागणी पाहून त्यांनी तिरंगा झेंडे निर्मिती केली. मात्र अनेक ध्वजांची किनार उसवलेली, दोरे निघालेले तर काही ध्वजांवर अशोचचक्र मध्यभागी न घेता दुसऱ्याच बाजूने छापले गेले. त्यात अनेक ध्वज फिके, गडद, तर काहींवर डाग पडलेले तर काही ध्वज वेड्यावाकड्या शिलाईचे निघाल्याच्या तक्रारी पैठण तालुक्यातील पाडळी, लाखेगाव, निलजगाव तसेच औरंगाबाद तालुक्यातील तिसगाव ग्रामपंचायतीने केल्या होत्या.

यासंदर्भात 'टेंडरनामा' वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी तातडीने अंकित काॅटन इंडस्ट्रीजचे मनोहर अग्रवाल यांना सूचना दिली. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी ध्वजसंहिता पालन करणारे झेंडे नसतील ते अग्रवाल यांनी परत घेत स्वखर्चाने इतर ठिकाणाहूण विकत घेत पुरवठा केला.

गुजरातच्या उत्पादकाने फसवले...

खराब ध्वज मी स्वतःच्या खिशातून खर्च करत बदलून देत आहे. अतिशय कमी कालावधीत ध्वजाचा पुरवठा करण्याचे 'ना नफा, ना तोटा' या तत्वावर काम हाती घेतले. अद्याप या कामाचा रुपया देखील मिळाला नाही. पण राष्ट्रीय कार्यात काम करण्याची संधी म्हणून हे काम हाती घेतले. त्यात गुजरातच्या ब्रोकरने फसवले आणि कामात विघ्न आले. तरिही मी परिस्थितीशी सामना करत माझे काम चोख बजावले. शासनाला विनंती आहे, की यापुढे असे राष्ट्रीय कार्य करायचे असेल तर वर्षसहा महिन्याअगोदर नियोजन करावे. म्हणजे धांदल उडत नाही, अशी प्रतिक्रिया मनोहर अग्रवाल यांनी व्यक्त केले.