Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात कोट्यवधींची उधळपट्टी कशासाठी?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सात महिन्यांपूर्वी विदेशी पाहुण्यांच्या स्वागताच्या नावाखाली शहराच्या सौंदर्यीकरणासाठी ५० कोटींची उधळपट्टी करून ८० कामे करण्यात आली होती. यातील बहुतांश कामांची वाट ठेकेदारांची (Contractors) देणी प्रलंबित असतानाच लागली. यावर्षी संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना आता मराठवाडा मुक्ती संग्रामसाठी चाळीस कोटींची उधळपट्टी कशासाठी, असा थेट सवाल खासदार ईम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केंद्र व राज्य सरकारला विचारला आहे.

यासंदर्भात 'टेंडरनामा'शी बोलताना जलील म्हणाले की, मी मराठवाड्याचाच भूमिपुत्र आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला माझा विरोध नाही. मला त्या हुतातम्यांचा अभिमान आहे, ज्यांनी मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान दिले. मात्र कृषिमंत्र्याच्याच जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात दुष्काळाचे संकट गडद असताना यातील काही उधळपट्टी अयोग्य आहे.

मराठवाड्यात २०२१ - २२ दरम्यान वर्षभरात तब्बल ९९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले असल्याची आकडेवारी 'टेंडरनामा'कडे उपलब्ध आहे. कधी अत्यल्प पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसाच्या तडाख्यात मराठवाड्यातील शेतकरी नेहमीच संकटात सापडला आहे.

दरम्यान यावर्षी पावसाळा संपत आला आहे. दुष्काळी संकटाचा सामना करताना हतबल होऊन मराठवाड्यातील अवकाळी पाऊस, शेतीचे नुकसान, आर्थिक विवंचना या गर्तेत अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारस्तरावर अनेक प्रयत्न केले जात असल्याचा दावा अजूनही फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.

विभागीय आयुक्तांच्या एका अहवालानुसार फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२३ दरम्यान मराठवाड्यात जवळपास सहाशेच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यात आता पावसाने ओढ दिल्याने सरकारी यंत्रणा, राज्य सरकारसमोर आत्महत्या सत्र रोखण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

मग ही उधळपट्टी कुणासाठी?

छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाडा मुक्तीदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या नावाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने येणाऱ्या व्हीआयपींसाठी मराठवाड्याची विभागीय राजधानी छत्रपती संभाजीनगरात कोट्यवधींची उधळण केली जात आहे. शहर विकासाच्या नावाखाली मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोतसवी वर्षाचे नाव पुढे करत छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य प्रवेश रस्त्यांवर व्हीआयपींच्या स्वागतासाठी तब्बल साडेपाच कोटींचे तात्पुरते मंडप उभारणी केली जाणार आहे. धक्कादायक म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनाच्या पूर्व संध्येस व्हीआयपींसाठी खास सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन व इतर तात्पुरत्या कामांसाठी तब्बल ९ कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे.

मंत्रिगण व्हीआयपी ज्या मार्गाने ये - करतील त्या मार्गांवर तब्बल चार कोटींची विद्युत रोषणाई केली जाणार आहे. धक्कादायक म्हणजे जी-२० परिषदेनिमित्त गेल्या सात महिन्यांपूर्वी झालेली कामेच मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी वर्ष व मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त तयार केलेल्या कामाच्या यादीत नमूद करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

विशेष म्हणजे जी कामे पाच ते दहा लाखांत सहज होऊ शकतात, अशा किरकोळ दुरूस्तीच्या कामांसाठी ५० ते ७० लाखांचा निधी दाखवण्यात आला आहे. यापुर्वी टेंडर झालेली पण रखडलेली कामे देखील यादीत नमूद करण्यात आल्याने त्यावेळचा मंजूर निधी कुठे गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी शहरातील विविध चौकांतील डावी व उजवी बाजूने वळण मोकळे करण्यासाठी पुन्हा ७० लाखांचे बोलार्ड रस्त्यांवर ठोकून नागरिकांच्या समस्येत भर पाडली जाणार आहे. यापुर्वीचा प्रयोग फेल झाल्याचे माहित असताना तोच प्रयोग  कामाच्या यादीत नमूद करण्यात आला आहे. शहरभर कोट्यवधींच्या सायकल ट्रॅकचे वाटोळे झाले असताना आता या निधीतून दिल्लीगेट ते हर्सुल टी पाॅईंट सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

जी - २० निमित्त उड्डाणपुलांखाली संरक्षित जाळ्या, उड्डाणपुलांची रंगरंगोटी, फाऊंटन, सौंदर्यबेट, वाहतूक बेट, दुभाजकांची दुरूस्ती व रंगरंगोटी झालेली असताना पुन्हा व्हीआयपी मार्गांवर ही कामे दाखवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे विनाटेंडर ही कामे घाईगडबडीत सुरू केल्याचा आरोपही काही कंत्राटदार करत आहेत.