beed bypass
beed bypass Tendernama
मराठवाडा

Aurangabad : 'त्या 'उड्डाणपुलाखालील अंडरपास ओलांडताना कोंडी होणारच

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : देवानगरी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल तयार झाल्यानंतर या रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर थांबण्याचा त्रास संपला असे असतानाच औरंगाबादकरांची  बीड बायपास रोडवरील संग्रामनगर चौकात वाहतूक कोंडीशी गाठ पडत होती.

गेल्या दहावर्षात शेकडो बळी घेतलेल्या या चौकात उड्डाणपुल व्हावा, अशी नागरिकांची जुनीच मागणी होती. नेमकी मागणी पुर्ण झाली तरी पुलाच्या सदोष डिझाईनमुळे औरंगाबादकर कोंडीत अडकणारच. मंगळवारी याच पुलाखाली अडकलेल्या एका कंटेनरने त्याचा साक्षी पुरावा दिल्याने हा पुल अडचणीचाच ठरणार असल्याची शहरभर चर्चा सुरू आहे.

सातारा परिसरातून शहरात येण्यासाठी बीड बायपास संग्रामनगर चौक ओलांडून देवानगरी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहनधारक येतात. येथील उड्डाणपूल तयार होण्याआधी सातारा भागातील नागरिकांना आणि साताऱ्यात जाणाऱ्या वाहनधारकांना रेल्वे क्रॉसिंगवर अनेकवेळा थांबावे लागत होते. देवानगरी रेल्वे क्रॉसिंगवर दिवसातून अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असे. उड्डाणपूल झाल्याने नागरिकांची रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या कोंडीतून सुटका झाली. मात्र, पुढे लगेचच बीड बायपास रस्ताला असणाऱ्या संग्रामनगर चौकात नव्या उड्डाणपुलाच्या सदोष डिझाईनमुळे पुन्हा कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

सातारा भागातील नागरिकांची संख्या वाढली तशी या भागातून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनधारकांचीही संख्या वाढली. बीड बायपासवरून भरधाव वेगाने येणारी वाहने आणि साताऱ्यातून बाहेर पडणारी वाहने यांचा सामना या संग्रामनगर चौकातील पुलाखालच्या अंडरपासमध्ये रोज पाहायला मिळत आहे.

आधी कोणी पुढे जायचे या प्रत्येक वाहनचालकाच्या अट्टहासापायी सगळीच वाहने या अंडरपासमध्ये अडकून पडू लागली आहेत. संग्रामनगर चौकात उड्डाणपूल करूनही या भागातल्या वाहतूक कोंडीवर उत्तर काही मिळू शकले नाही. आधी देवानगरी रेल्वेमुळे होणारी कोंडी आता बीड बायपासवरील या सदोष उड्डाणपुलामुळे होऊ लागली आहे.

प्रशासनाने बीड बायपासवरील या पुलाची उंची पूर्वीच्याच रस्त्यांपासून किमान साडेसहा ते सात मीटर करावी.आमदार रोड ते बायपास दरम्यान रहदारीसाठी व्हेईकल अंडरपास करावा तसेच पुढील अंडरपासची लांबी, रूंदी वाढवावी याबाबत सातारा-देवळाईसह बीड बायपास परिसरातील नागरिक मागणी करत आहेत.  मात्र, त्यानंतरही प्रशासन येथील पुलाच्या सदोष डिझाईनमध्ये फेरबदल करून कोंडी फोडायला तयार नाही. अनेकदा येथे सर्व बाजुंनी वाहनांच्या एवढ्या रांगा लागतात की, येथे उपस्थित असणारे वाहतूक पोलिस ही कोंडी फोडू शकत नाहीत. दुसरीकडे कंटेनर अडकण्याचे प्रमाणही वाढलेले आहे.