Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

देवानगरी मार्गावरील 'त्या' धोकादायक पुलाची दुरुस्ती होणार

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : शहानुरवाडी भागातील देवानगरी ते प्रतापगडनगर स्मशानभूमी तसेच देवानगरी ते निवास काॅलनी नाल्यावरील मोडकळीस आलेल्या धोकादायक पुलासाठी स्मार्ट सिटी रस्ते विकास प्रकल्पातून निधी रुपये मंजूर करण्यात आला आहे. तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांनी धोकादायक झालेल्या या पुलाची पाहणी केली होती. काॅंक्रिट रस्त्यांच्या दरम्यान तातडीने पुलाचे बांधकाम करण्याची सूचना स्मार्ट सिटी प्रकल्प अभियंता इम्रान खान यांना केली होती. त्यानुसार माजी नगरसेविका शोभा बुर्हांडे यांच्या प्रयत्नांतून या पुलासाठी बजेटमधून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या पुलांचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. सद्यस्थितीत या दोन्ही नळकांडी पुलांचे आरसीसी पाइप गाळाने भरलेले आहेत. पाण्याच्या प्रवाहात कठडे देखील वाहून गेले आहेत. त्यामुळे पूल खचल्याने ते वाहतुकीस धोकादायक झाले आहेथ. पांण्डेय यांनी तत्काळ दखल घेत या पुलांची दुरूस्ती करण्याचे दिलेले आश्वासन पाळले. 

निवास काॅलनी ते देवानगरीरोड, तसेच देवानगरी ते प्रतापगडनगर स्मशानभूमी नाल्यावरील ४०  वर्षापासून पुलांचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचे प्रश्न प्रलंबित होते. त्याकरिता संबंधित विभागासी विविध प्रकारचा पत्रव्यवहार, निवेदने, ठराव आदी सर्व प्रकारचे दस्तऐवज सादर केल्यानंतरही त्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव माजी नगरसेविका शोभा बुरांडे यांना येत होता. पूल आणि रस्त्यांबाबत त्यांचा सातत्याने मनपातील प्रभाग अभियंता ते आयुक्तांपर्यंत पाठपुरावा सुरू होता. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देवून वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला जात होता.

सदर काम सुरू करण्याकरिता मनपाने काही वर्षापूर्वी डीफर्ट पेमेंटमध्ये समावेश केला होता. मात्र बांधकाम  विभाग व ठेकेदार या दोन्हींचे योग्य ताळमेळ जुळत नसल्यामुळे बुर्हांडे यांनी या योजनेत काम करण्यास विरोध केला होता. कारण काम सुरू करण्यासाठी मनपा तिजोरीचा  अडसर निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेत टेंडर निघतात, ठेकेदार निश्चित केले जातात. सर्व प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा ठेकेदार काम सुरू करत नसल्यानेच योजनेला विरोध होता. सदर काम हे एकतर सरकारी अनुदानातून व्हावे अन्यथा स्मार्ट सिटी प्रकल्पातून व्हावे असा त्यांचा आग्रह होता. सतत पाच वर्ष मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. सदर पुलांसह रस्ते बांधकामाला मोठा निधी प्राप्त झाला व हा प्रश्न निकाली निघाला. 

देवानगरी ते प्रतापगड स्मशानभूमी तसेच देवानगरी निवास काॅलनी मार्गाने सातारा, देवळाई, बीडबायपास, स्वामी विवेकानंदनगर, पीडब्लूडी काॅलनी, जिजाऊनगर, छत्रपतीनगर, भीमाशंकर काॅलनी, ज्योतीनगर, दशमेशनगर व अन्य परिसरातील नागरिक येणे जाणे करतात. शहानुरवाडी आठवडी बाजार ही परिसरातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे मोडकळीस आलेल्या पुलावरून अपघातासारख्या संकटाचा सामना करावा लागत असे. 

तसेच पावसाळ्यात पुलांवरून पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने विद्यार्थ्यांसह अनेकांना जाण्यायेण्यास अडचण निर्माण होत असे. मोडकळीस आलेले पूल आणि उखडलेल्या रस्त्यावरून जाता येताना अपघाताचे प्रमाण वाढलेले होते. रात्रीच्या वेळेस जाण्या येण्यास नागरिकांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागत असे. पावसाळ्याच्या दिवसात तर नाल्याला पूर आल्यानंतर चार, पाच दिवस रस्ता बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असे.  तसेच फिरत्या व्यापारी वर्गाला सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागत असे.

...आस्तिककुमारांच्या रुपात देव पावला

सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून पूल व रस्त्यांच्या प्रलंबित कामासाठी तत्काळपणे स्मार्ट सिटी रस्ते विकास योजनेतून सुरू करण्यासाठी तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांनी हालचाली केल्या व हे काम हाती घेण्यात आले. गत ४० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न निकाली निघाला.